अमळनेर पोलिसांची गडखांब शिवारात मोठी कारवाई; गांजाची शेती केली उद्ध्वस्त
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांनी भल्या पहाटे धाड टाकत एक बिघा आणि त्या पेक्षा जास्त क्षेत्रातील गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत ओला व सुका गांजा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला असून, संबंधित शेतकरी सुरेश लोटन पाटील याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मका पिकासोबत गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गट क्रमांक 2324 मध्ये गांजाची लागवड होत असल्याची खात्री झाली. त्यानंतर डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना पंचनामा प्रक्रियेसाठी सोबत घेण्यात आले. ७ रोजी सकाळी ६ वाजता पोलिस पथकाने छापा टाकत शेतात सहा फूट उंच गांजाची झाडे, तसेच पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला व एका ठिकाणी वाळवण्यासाठी ठेवलेला गांजा आढळून आणला.तपासादरम्यान संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी गांजा विकल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पंचनामा सुरू केला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व झाडे उपटून मुद्देमाल जप्त करण्यात येणार आहे. अमळनेर पोलिसांच्या या ठोस कारवाईमुळे अमली पदार्थांविरोधातील लढ्याला नवी धार मिळाली असून, अवैध लागवडींवर कठोर नजर ठेवली जाणार असल्याचे पो. नि. निकम यांनी सांगितले.