अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्राला मंजुरी – शेतकऱ्यांचा होणार फायदा
अमळनेर : विक्की जाधव
अखेर अमळनेर तालुक्याला शासकीय कापूस खरेदी केंद्र (सीसीआय)ची मंजुरी मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय भावाने कापूस विक्रीची संधी उपलब्ध होणार असून लाखो रुपयांचा फायदा होणार आहे.
मागील वर्षी अमळनेरला सीसीआय केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५०० ते १६०० रुपयांनी कमी भावात कापूस विकावा लागला. त्यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शिवाय अनेकांना इतर तालुक्यांतील केंद्रांवर जाऊन विक्री करावी लागल्याने अतिरिक्त वाहनखर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला होता. यंदा मात्र सभापती पाटील यांनी सचिव उन्मेष राठोड यांच्या मदतीने सुरुवातीपासून प्रस्ताव तयार करून खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. अखेर कापूस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी इंद्रप्रकाश लाटासर यांच्या सहकार्याने अमळनेर सीसीआय केंद्राचा समावेश ऑनलाइन यादीत झाला आहे.

या केंद्रामुळे शेतकऱ्यांना शासकीय भावाची हमी तर मिळणारच, शिवाय विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व वेळेची बचत होईल. यावर्षी शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ‘कपास किसान’ ऍप वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. सातबारा उतारा, आधारकार्ड आणि पिकपेरा यासह सर्व माहिती भरून नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांचा कापूस शासकीय दराने खरेदी होईल.
सभापती अशोक पाटील म्हणाले की, “अमळनेर तालुक्यासाठी सीसीआय केंद्र मिळणे ही मोठी दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल. आता दलालगिरी व कमी भावाच्या विक्रीला आळा बसेल.”