शहरात चोरीचं सत्र सुरूच! चोरट्यांना खाकीचा धाक राहीलेलाच नाही!
अमळनेर : विक्की जाधव
शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, चोरट्यांनी आता बँकेबाहेरही लूट घडवायला सुरुवात केली आहे. नुकत्याच घडलेल्या प्रकारात शेतीच्या मशागतीसाठी पैसे काढणाऱ्या शेतकऱ्याची ३ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
शिवाजी भानुदास पाटील (वय ५९, व्यवसाय – शेती, रा. वासरे, ता. अमळनेर) यांनी शेतीसाठी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी १० जून रोजी दुपारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अमळनेर शाखेतून ३ लाख रुपये रोख रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी पिशवीत ठेवून दुचाकीच्या हँडलला टांगली आणि खरेदीसाठी शहरात फेरफटका मारू लागले.
विजय शॉपीजवळील फळांच्या हातगाडीवर आंबे खरेदी करताना त्यांनी दुचाकी जवळ लावून पिशवी गाडीलाच टांगलेली ठेवली. पण परत आल्यावर त्यांना ती पिशवी दिसलीच नाही. अज्ञात चोरट्याने संधी साधत सदर रक्कम पळवली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत.