खजिना रिकामा, विकासाचं स्वप्न विकताना… अमळनेर पालिकेची थकबाकी ‘शतकपार’!
अमळनेर : विक्की जाधव
एकेकाळी ‘सेवा हाच धर्म’ हे ब्रीद घेऊन विकासाच्या वाटेवर झेपावलेली अमळनेर नगरपरिषद आता स्वतःच “कर्जाच्या खंदकात” अडकलेली आहे. बँकेच्या खात्यावर टाच, गहाण ठेवायला मालमत्ताच नाही, आणि हातात उरलेय ते फक्त १०७ कोटींचं थकबाकीचं भूत!
नेरकर केव्हा होतील जागी.. पोट भरल्यावर घेताय कां सुस्तीची झोप?.
२०११ ते २०१८ दरम्यान विकासाच्या नावाखाली घेतले गेलेले कर्ज आता विकासाऐवजी व्याज वाढवण्याचे काम करत आहे.
एकूण ३६ कोटींचं कर्ज, पण परतफेड मात्र फक्त २ कोटींची! त्यामुळे आज व्याजासकट थकबाकीचा आकडा पोहोचला आहे तब्बल शंभर कोटींच्या पार.
पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या, सांडपाणी व्यवस्थापन… या सगळ्याच योजना आता कागदावरच उरल्या आहेत. एकीकडे नळाला पाणी नाही, दुसरीकडे रस्त्याला खड्ड्यांचा डोंगर – आणि मध्ये अडकलेली आहे ती जनता.
प्रशासन म्हणतं, “परिस्थिती बिकट आहे.” पण जनता विचारते, “इतकी बिकट झाली तरी तुमचं जबाबदारीचं नातं कुठं गेलं?”
दरम्यान, जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी वसुली सुरू केली असली तरी अमळनेरमध्ये अजूनही ‘मी करेन’, ‘तू कर’ अशा टोलवाटोलवीच्या खेळात वेळ वाया जातोय.
‘१०७ कोटींचं स्वप्न… की दारिद्र्याचं सत्य?’
या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल, तर केवळ कर्जमाफीतून नव्हे, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातूनच मार्ग काढावा लागेल. अन्यथा, ‘पालिका’ हा शब्द भविष्यात ‘पालखी’सारखा केवळ शोभेपुरताच उरेल.
सविस्तर पुढे – वाचत रहा फक्त मार्मिक समाचार.
ज्यावर आहे वाचकांचा विश्वास…