“एकनिष्ठतेचा स्टॅम्प पेपर हरवलेला वाटतोय ताई!”
32 वर्षे एकनिष्ठ असल्याचा दावा करणाऱ्या तिलोत्तमा पाटील यांचा नवा राजकीय प्रवास आणि जुन्या शब्दांवर उठलेले प्रश्न
विक्की जाधव, मार्मिक न्यूज नेटवर्क :
“एकच पक्ष, एकच नेता, एकनिष्ठता हीच ओळख” असं प्रतिज्ञापत्रात ठणकावणाऱ्या तिलोत्तमा रविंद्र पाटील यांनी स्वतः स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलेली निष्ठा आता नवीच वळणं घेताना दिसत आहे. जयंत पाटलांना एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा देणाऱ्या ताई, आज मात्र अजित पवार गटात झेंडा घेऊन मिरवत आहेत.
अमळनेरमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करून निष्ठेचा डंका वाजवणाऱ्या ताईंनी आता त्या बॅनर्सचं काय केलं? हा प्रश्न सामान्य जनतेपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना पडला आहे.
“स्वार्थासाठी स्टॅम्प पेपरही बदलतात” – कार्यकर्त्यांचा आरोप
स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा असलेल्या अनिल पाटलांविरोधात काही काळ पूर्वीच गुप्त कुरघोड्या केल्या गेल्या, असा आरोप पक्षातीलच काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी मार्मिकशी बोलताना केला. “आज ज्या पक्षात प्रवेश केलाय, तिथं कोणती निष्ठा घेऊन गेलात?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
भविष्यकाळात परिणाम दिसेल ?
आजही तालुक्यात शरद पवार यांचा प्रभाव मोठा आहे. निष्ठेचे शब्द स्टॅम्प पेपरावर उमटवून त्याच शब्दांपासून माघार घेणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल, असं स्थानिक जाणकारांचं म्हणणं आहे.