पाळीव प्राण्यांसाठी आता अधिकृत अंत्यसंस्कार व्यवस्था अनिवार्य..
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
राज्यात यापुढील काळात पाळीव कुत्रे, मांजर यांच्यावरही अधिकृतरीत्या अंत्यसंस्कार करणे बंधनकारक होणार आहे. नगर विकास विभागाने नुकताच यासंदर्भात शासन आदेश जारी केला असून, सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विशेष स्मशानभूमीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
घर खरेदी करतांय मुंदडा बिल्डर्स आहेचं की मुंदडा म्हणजे प्रतीक विश्वासाचं..
मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनात या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर शासनाने तातडीने पावले उचलत, प्राण्यांच्या मृतदेहाच्या योग्य विल्हेवाटीचा मार्ग आखला आहे.
सध्या अनेक ठिकाणी मृत पाळीव प्राणी खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याची डबकी किंवा रस्त्यावर टाकले जातात. त्यामुळे दुर्गंधी पसरते, परिसरात अस्वच्छता वाढते आणि रोगराईचा धोका वाढतो.
ही समस्या टाळण्यासाठी नगर विकास विभागाच्या आदेशानुसार सर्व घनकचरा व्यवस्थापन केंद्रांच्या शेजारी पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र अंत्यसंस्कार सुविधा निर्माण केली जाणार आहे. यामुळे पर्यावरण स्वच्छतेस मदत होणार असून, प्राण्यांप्रतीची आपुलकी आणि सन्मान जपण्यासही हातभार लागणार आहे.
राज्यभरातील सर्व नागरिकांना आता त्यांच्या प्रिय पाळीव प्राण्यांचा सन्मानपूर्वक निरोप देता येणार आहे!