झोपडीत जाऊन रामनवमी साजरी करत साक्षीच्या जीवनात फुलविला आनंद
रामनवमी कृतीतून साजरी करत साक्षीच्या लग्नाला ११ हजार रुपयांची मदत..
चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम राबवित कर्मयोगी ग्रामीण भागात गल्लोगल्ली आपली मदतीची व प्रेमाची वारी घेऊन जात आहे. ही वारी रामनवमीच्या दिवशी लग्नकार्यासाठी चोविसवी मदत घेऊन वडिलांचे छत्र हरवलेल्या व लहान बहीण १०० टक्के विकलांग असलेल्या पिपलधरा ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील कु. साक्षी गजाननराव उईके ताईंच्या झोपडीत जाऊन पोहोचली.
पुढील महिन्यातील २९ मे २०२५ ला साक्षी ताईचे लग्न होत आहे. ती तारुण्याच्या वाटेवर असतांनाच कोरोना काळात, वयाचं अठरावं वर्ष सुरू असतांनाच वडिलांचे छत्र कोरोनाने आपल्या घशात घातले. कोरोनाने वडिलांना काळाच्या पडदयाआड करून साक्षी व सायली या बहिणींना पोरके करून सोडले.
साक्षीच्या आई आशा
ताईचे जिवन सुद्धा सुरवातीपासूनचं गारीबीतचं गेले
आपल्या दोन भावांना शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी चौथ्या वर्गापासून आपले शिक्षण थांबवून आपल्या दहेली गावी आईसोबत शेतीचे कामे करू लागल्या. आपले दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटतिल असं त्यांना वाटायचं पण हा एक समजचं ठरला, मोठी मुलगी साक्षी होईपर्यंत ठीक होते, परंतु दुसरी मुलगी सायली ही १०० टक्के अपंगत्व घेऊन जन्माला आली व तेथूनचं आयुष्यातील दुःखाचे खरे सूर झिरपायला लागले…
सासऱ्यानी आशाताईला वेगळे काढले. आशा ताईंनी गुरांच्या कोठ्यात आधार घेतला व आपल्या संसाराचा गाडा गजाननराव यांच्या सोबत आहे त्या परिस्थितीत सुरू ठेवला.
गजाननराव शेतमजुरी करत होते तर छोटी मुलगी सायली ही कमरेने रेंगाळत असल्यामुळे, तिला उभं राहणं, चालणं व बोलणं सुद्धा जमत नसल्यामुळे आशाताई तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व तिचं करण्यासाठी घरीच थांबायच्या. साक्षी शाळेत जाऊ लागली होती तर गजाननराव याचकाळात गवंडीकाम शिकले होते. गजाननरावच्या मजुरीवर घर चालत होते, परंतु एकाएक वडिलांना वाताच्या बिमारीने ग्रासले व त्यांच्या हातपायावर सुजण येत असल्यामुळे ते घरीच राहू लागले व त्याचं काळात कोरोना आला व आपल्या सोबत गजनानरावांना घेऊन गेला.
आशाताई समोर आता दुखापेक्षाही आर्थिक अडचणींचा डोंगर उभा होता. सायलीला सोडून त्या कामाला जाऊ शकत नोव्हत्या, त्यामुळे घरखर्च चालविण्यासाठी साक्षीने आपले शिक्षण बंद केले व आपल्या बहिणीची देखभाल करू लागली त्यामुळे आशाताई शेतमजुरीला जाऊ लागल्या व घर चालवू लागल्या.
साक्षी यावर्षी २२ वर्षाची झाली व आईला काळजी लागली ती साक्षीच्या लग्नाची ती त्यासाठी ईश्वराला प्रार्थना करू लागली. ताईंच्या प्रार्थनेला यश आले व साक्षीचे लग्न जुळून आले, परंतु परिस्थिती इतकी हालाकीची, की लग्नाचा खर्च कसा करणार व कोणाकडून कर्ज घेतो तर ते फेडणार कसे कारण साक्षी सासरी गेल्यानंतर ताईला सायलीची देखभाल करण्यासाठी घरीच थांबावे लागणार त्यांना निराधारचे मिळणारे १५०० व सायलीला अपंगत्वाचे मिळणारे १५०० यातूनच जीवनाचा पुढचा प्रवास करावा लागणार त्यामुळे
या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत व आशा ताईंचा जीवघेणा संघर्ष पहात कर्मयोगीने साक्षीचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जयंतीला ११ हजार रुपयांची मदत करत साक्षीला साडीचोळी देऊन कृतीतून रामनवमी साजरी केली.
या हृदयस्पर्शी कार्यक्रमाला गावकरी मंडळी व कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते..