शांतता भंग करणाऱ्यांची गय नाही – परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले
अमळनेर: विक्की जाधव.
“शहरातील शांतता भंग करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही!” असा इशारा परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांसोबतच ग्रुप ऍडमिनवरही गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी ईद, गुढीपाडवा आणि रामनवमी या सणांच्या पार्श्वभूमीवर गांधलीपुरा पोलीस चौकीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना डीवायएसपी बारबोले यांनी नागरिकांना शांततेचे आणि बंधुभावाचे आवाहन केले.
जातीयवादाला थारा नाही – अमळनेर शांततेचा संदेश देणारे शहर
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!” असा संदेश देणाऱ्या पूज्य सानेगुरुजींच्या अमळनेरात जातीय वादाला थारा नाही. काही समाजकंटक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र अशा प्रकारांना कोणतीही गय केली जाणार नाही,” असेही बारबोले यांनी स्पष्ट केले.
शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा.
दंगलीमध्ये कुणाचाही फायदा होत नाही, उलट समाजाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे “आम्ही बाहेरचे असूनही जबाबदारी घेतो, तुम्ही तर या गावाचेच आहात, तुमची जबाबदारी अधिक आहे,” असे ते म्हणाले. “सर्व सण शांततेत पार पाडा, काही अडचण असल्यास चर्चा करा, चर्चेतूनच प्रश्न सुटतील!” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
शांतता समितीच्या बैठकीस महत्त्वपूर्ण उपस्थिती.
या बैठकीस सर्व पत्रकार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव, मुक्तार खाटीक, सलीम टोपी, संजय पाटील, नरेश कांबळे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक आणि हिंदू-मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते.