गटशेतीच्या माध्यमातून होणार शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन.
अमळनेर : विक्की जाधव
अजिंक्य तारा ग्रुप, सातारा व श्री.अंबरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुप, अमळनेर यांना एकत्रित आमंत्रण आज डॉ. अविनाश पोळजी, पाणी फाउंडेशन यांच्या तर्फे दिले होते. आज बालेवाडी, पुणे येथील महाराष्ट्रातील शेतकरी गटांचा सत्कार करण्यात आला. यात अमळनेर येथील धरती माता महिला गट, पिंपळे खु, अमळनेर. यांचा तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक देण्यात आले, या प्रसंगी पाणी फाउंडेशन समन्वयक सुनील पाटील व तुषार राऊत, टेकडी ग्रुप सदस्य आशिष चौधरी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार 2024 सोहळा’ संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्याचा श्रीगणेशा केल्याबद्दल आमीर खान यांचे आभार. महाराष्ट्रामध्ये 2015 पासून पाण्याचे जनआंदोलन सुरु झाले. राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरु केली. कारण शाश्वत शेतीसाठी गावे जलसमृद्ध होणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रामधील 20 हजार गावांनी स्वतःला जलपरिपूर्ण केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना सुरु केली आहे. तसेच शेतकऱ्यांना 2026 पर्यंत 365 दिवस रात्रीऐवजी दिवसाच्या वेळी सोलर फिडरद्वारे वीज देण्यात येणार आहे. राज्य शासनाने गावातल्या प्राथमिक सोसायट्या या मल्टीपर्पज सोसायट्या व ऍग्री बिझनेस सोसायटीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या सोसायट्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल, साठवण व्यवस्था करता येईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, अभिनेता आमिर खान, निर्मात्या-दिग्दर्शिका किरण राव, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथाजी व इतर मान्यवर उपस्थित होते.