शाळेच्या रेकॉर्डमधील चुकीच्या नोंदीत बदल करण्यास विलंब – शिक्षणाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका!
अमळनेर : विक्की जाधव.
शाळेच्या रेकॉर्डमध्ये चुकीची जात नोंद असल्याने बदलासाठी अर्ज करणाऱ्या डोंगर नवसारे यांच्या अर्जावर शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळेत कार्यवाही न केल्याने आता उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. “दोन आठवड्यात अर्ज निकाली काढा अन्यथा कोर्टासमोर हजर राहा!” असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे.
सदर प्रकरणाचे सविस्तर वृत्त असे की :
डोंगर नवसारे यांनी त्यांच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये चुकीचा जात उल्लेख दुरुस्त करण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, त्यांनी शाळा सोडलेली असल्यामुळे हा बदल शक्य नाही असे कारण देत शिक्षणाधिकारी, धुळे यांनी अर्ज फेटाळला. याविरोधात डोंगर नवसारे यांनी एडवोकेट निलेश भागवत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय:
सुनावणी दरम्यान, माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही चुकीची नोंद दुरुस्त केली जाऊ शकते. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले.
अद्याप कार्यवाही नाही, शिक्षणाधिकाऱ्यांना कोर्टाची ताकीद!
न्यायालयाच्या आदेशानंतरही अर्ज निकाली काढण्यात दिरंगाई झाल्याने डोंगर नवसारे यांनी अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला – “दोन आठवड्यांत अर्जावर निर्णय घ्या, अन्यथा थेट कोर्टात हजर राहा!”
अवमान याचिकेत याचिकाकर्त्यांच्या वतीने
सदर प्रकरणात एडवोकेट निलेश भागवत यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. आता शिक्षणाधिकारी या आदेशाची अंमलबजावणी करतात की न्यायालयासमोर हजर राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.