घिटरे खून प्रकरणात मुख्य आरोपीस मा. उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर.
विक्की जाधव मार्मिक न्यूज नेटवर्क :
ता. गंगापूर: रायपूर गावात २६ जून २०२३ रोजी भावंडांमध्ये जमिनीच्या वादाला हिंस्त्र वळण लागले, ज्यात श्री भिकचंद घिटरे मयत झाले. सदर घटनेचे साक्षीदार श्री परमेश्वर घिटरे यांच्या दिलेल्या माहितीनुसार, श्री भानुदास घिटरे यांनी लोखंडी अँगलने मयत भिकचंद घिटरे यांच्या डोक्यात वार करुन त्यांचा मृत्यू केला.
या प्रकरणात पोलिसांनी श्री परमेश्वर घिटरे यांच्या निवेदनावरून गुन्हा नोंदविला, ज्यात मुख्य आरोपीसह इतर ६ आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांन्वये (कलम ३०२, ३२६, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६) न्यायालयीन कार्यवाही सुरू होती.
मुख्य आरोपी भानुदास घिटरेने जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु प्रथम याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर, मुख्य आरोपीने ॲड. चव्हाण आणि ॲड. अनघा पेडगांवकर यांच्यामार्फत दुसऱ्यांदा जामीन याचिका दाखल केली.
या जामीन याचिकेवर ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोपीकडून ॲड. चव्हाण परभात आणि ॲड. पेडगांवकर यांनी युक्तिवाद केला, तर शासनाच्या वतीनेही युक्तिवाद करण्यात आला. यानंतर, मा. उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्य आरोपी भानुदास घिटरे यांना जामीन मंजूर केला.