“छावा” चित्रपट पाहून माझे मतपरिवर्तन झाले….
कुठे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ? आणि कुठे मतलबी राजकारणी ? अनन्वित अत्याचार सोसूनही ते झुकले नाहीत. त्यांच्या सारख्या महापराक्रमी व सुविद्य राजाला घरभेद्यांमुळे औरंगजेबाच्या सापळ्यात अडकून यातनामय मरण पत्करावे लागले.
आणि मी पक्षप्रमुखांची भेट मिळाली नाही म्हणून नाराजी व्यक्त करीत आहे.पक्ष प्रमुखांच्या भेटीला मी इतके का महत्व दिले ? हेच समजत नाही व खंतही वाटते.
या सात महिन्यात मी जर माझ्या साहित्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले असते, गीत लेखन केले असते वा निष्पक्ष पत्रकारिता केली असती, सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित केले असते तर किती तरी नाव लौकिक कमावला असता. एखादे पुस्तक प्रकाशित केले असते. ज्यांना आपल्या भेटीचे महत्व वाटत नाही, अपमानास्पद वागणूक मिळते; त्यांची भेट ही निव्वळ पक्षहितासाठी असूनही ती मिळत नसेल तर कक्षाला हवी ती भेट ? ज्येष्ठ शिवसैनिक ही बिरूदावली मिरवूनही उपेक्षा होत असेल तर कशाला हवे ते राजकारण व निष्ठेचा टेंभा मिरवणे ?
संभाजी महाराजांचा घात करणारे गणोजी शिर्के व अनाजी पंत हे मुखवटे बदलून आजही सक्रिय आहेत.
आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा रक्ताचे नाते नसलेले मावळेच जीवाला जीव लावतात. ही नाती पक्षापलिकडे जाऊन जपली पाहिजेत. अंध निष्ठेपायी अनेक जीवलग दूरावले, विकतचे वैर घेतले. ही दरी दूर करून पक्षविरहित राजकारण केलेले बरे !
आपण आपल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून स्वानंद मिळवून परमानंद ही द्यावा अशी माझी धारणा झाली आहे. त्यामुळे आज पाहिलेला छावा हा चित्रपट माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे. आता राजकारणापेक्षा आपल्या छंदाला वेळ द्यावा, दूरावलेले मित्र जोडावेत,असे वाटू लागले आहे.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०