शेतकरी,सरपंच,ऊस वाहतूकदार यांच्या वेगवेगळ्या मागण्यांच्यासाठी कराड ते मंत्रालय पदयात्रा व धडक मोर्चा : अमर पवार
प्रतिनिधी : अजिनाथ कनिचे
:- रयत क्रांती संघटना, सरपंच परिषद व ऊस वाहतूकदार संघटना यांच्यातर्फे पदयात्रा व भव्य रॅली काढली जाणार आहे. 22 मे 2023 रोजी कराड येथून सातारा पर्यंत पायी पदयात्रा हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन काढण्यात येणार आहे.तसेच सातारा ते मंत्रालय वाहनाने रॅली निघणार आहे. सदर पदयात्रा व रॅलीचे नेतृत्व माजी मंत्री सदाभाऊ खोत हे करणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून रयत क्रांती संघटना, सरपंच परिषद व ऊस वाहतूकदार संघटना यांचे कार्यकर्ते व संबंधित शेतकरी ऊस वाहतूकदार, सरपंच उपसरपंच, सदस्य हजारोच्या संख्येने या पदयात्रेमध्ये व भव्य रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे व पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांनी सांगितली.
कारण जवळजवळ 31 मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकरी आठवडे बाजार सुरू करावा व शेतकऱ्यांना शहरांमध्ये शेतमाल विक्री परवानगी मिळावी, दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची 25 किलोमीटरची अट रद्द करावी, शेतकरी अथवा फार्मर प्रोडूसर कंपनीला इथेनॉल निर्मितीचे परवाने मिळावेत, तुकडे बंदी कायदा रद्द करावेत व गुंठे विक्रीस परवानगी मिळावी. सर्व प्रकारच्या शेती कर्जासाठी सिबिलची कसलीही अट नसावी.खेड तालुक्यातील सेझ बाधित शेतकऱ्यांना पंधरा टक्के परतावा मिळावा तसेच खेड तालुक्यातील रद्द झालेल्या चासकमान भामा आसखेड कॅनलचे जमिनीवरील संपादनाचे शिक्के काढावेत. ऊस वाहतूकदार यांना फसवणाऱ्या ऊस तोडणी मजुरावर फौजदारी कारवाईची तरतूद व्हावी व तात्काळ अटक करण्यात यावी. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळामार्फत ऊस तोडणी मजूर पुरवावेत, मुंबई येथील सरपंच भवन तात्काळ मोकळे करून द्यावे ते भाड्याने दिले आहे तसेच सर्व सुविधायुक्त सरपंच भवनाची निर्मिती मुंबईमध्ये करण्यात यावी. सरपंच उपसरपंच यांना एसटी प्रवास मोफत व्हावा. सरपंचांना ओळख पत्राद्वारे मंत्रालयामध्ये परवानगी मिळावी. सरपंचांना दरमहा दहा हजार रुपये व उपसरपंचांना दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळावे. पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये सरपंच कक्ष उभारण्यात यावेत.
काजू उत्पादकांना एक लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी. तसेच बारसू येथील प्रस्थापित रिफायनरी प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन होणार आहेत त्यांना कंपनीमध्ये शेअर्सधारक करून भागीदारी मिळावी. अशा अनेक प्रश्नांसाठी 22 मे रोजी कराड येथून सातारा पर्यंत पदयात्रा व त्यानंतर सातारा ते मंत्रालय भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या पदयात्रेमध्ये व रॅलीमध्ये बहुसंख्य शेतकरी,सरपंच, उपसरपंच ऊस वाहतूकदार यांनी सहभागी व्हावे असेही आव्हान करण्यात येत आहे. अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे व पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांनी सांगितली.