एकनाथ शिंदेंचा आतंकवाद
माॅ कामाख्या देवी तुझा भक्त बघ कसा झाला वेडापिसा !
भा.दं.संहितेचे कलम-३६३,३६७,
३६८, ३८५, ३८७, ४०९, ४६८, ४७१, ४४८, ४५२, ४२७, ५०४, ५०६ (२), ५०७,१२० (३४) यात २ वर्षापासून १० वर्षांपर्यंतची शिक्षा असताना १५ जणांच्या लवाजम्यासह शाखेत जाऊन शहर प्रमुख राजेंद्र चौधरींना ताब्यात घेता,रात्रभर बसवुन मोठया नेत्याचे दर्शन घडवून शरणागती पत्करायला लावायच्या अटीवर बिनधास्त सोडून देतात.कायद्याचा धाक दाखवुन गटात प्रवेश करायला भाग पाडता,पोलीसही मिंधे सरकारचे दलाल बनुन काम करतात ?
केंद्र सरकार इडी,सीबीआय व आयटीचा धाक दाखवुन ब्लॅकमेल करीत असताना त्यांचे मिंधे आयपीसीचा सरसकट गैरवापर करून ब्लॅकमेलिंग करून पक्ष प्रवेश करायला मजबूर करतात ! हा लोकशाहीचा व घटनेचा गैरवापर आहे.
हे दुसरे तिसरेे काही नसून सरळ सरळ दहशतवादी कृत्य आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच जर असा दहशतवादी असेल तर महाराष्ट्र राज्य हे जुलमी मोगल राज्यालाही मागे टाकणारे ठरेल. जुलमी राजवटीचा अतिशय वाईट पद्धतीने अंत तरी होतो किंवा तोच स्वतःचा अंत करून घेतो ! अशी असंख्य उदाहरणं इतिहासात आहेत.
एकनाथ शिंदे हे फक्त पक्ष सोडून गेले असते तर कोणालाही सोयरसुतक नसते पण त्यांनी तर ज्या पक्षाची फळं, फुलं चाखली,सावलीत वाढले ऐश्वर्यसंपन्न झाले त्या वटवृक्षावर घाव घालण्याचे दु:साहस केले,त्याला “कृतघ्न व गद्दार” यापेक्षा सहज सोपा शब्द माझ्या शब्द कोषात नाही.
तुमचा आतंकवाद तरी किती ?तुम्ही बदलापुरच्या एकनिष्ठ वामन म्हात्रेला एमआरटीपीचा धाक दाखवुन नेले,आमदार बालाजी किणीकर यांना अरविंद वाळेकर पासून संरक्षण देण्याच्या निमित्ताने नेले,तुम्ही सुशील पवारला त्याचे हाॅटेलचे बांधकाम तोडण्याची भीती घालून नेले, तुम्ही रमेश चव्हाणचा बंगला तोडण्याची भीती घालून पळवले, तुम्ही अरविंद वाळेकर यांचे प्रथम पोलीस संरक्षण काढून बघितले त्याचा परिणाम होत नाही तर एका खुनाच्या गुन्ह्यात गुंतवण्याचा धाक दाखवुन नेले.ही तर माझ्या आसपासची मोजकी उदाहरणं आहेत.महाराष्ट्रभर तुम्ही किती थैमान घातले,याचा हिशेबच नाही.प्रताप सरनाईकांना ईडीचा धाक दाखवत नेले व पुन्हा इडीची रेड टाकुन ११.५ कोटी जप्त करायला लावले.४० अधिक १० आमदारांना परराज्यात नेऊन कटकारस्थान करून व भाजपाला फितुर होऊन मुख्यमंत्री पद मिळवले आणि सहकारी आमदारांना मंत्री मंडळ विस्ताराचे गाजर दाखवुन लटकवत ठेवले. तुमच्यावर लोक का व कसा विश्वास ठेवतात ? हा माँ कामाख्या देवीचाच “चमत्कार” म्हणावा लागेल.
तुमच्या गळाला न लागलेले विजय साळवी व माझ्या सारखे असंख्य निष्ठावंत आहेत. राजेंद्र चौधरी हे माझे जुने सहकारी आहेत.ते वयाने व ज्येष्ठत्वाने लहान असूनही मी त्यांचा मान सन्मान ठेवत आलो.उल्हास नगरचा झुंझार वाघ म्हणून जाहिररित्या संबोधित आलो. उल्हासनगर शिवसेनेचे १५ वर्षे त्यांनी यशस्वी नेतृत्वही केले. परवा पर्यंत ते निष्ठेच्या शपथा व आणाभाका जाहिररित्या घेत होते. पण एका केसमुळे ते ढेपाळले व तुमच्या आतंकवादाला शरण गेले. राजेंद्र चौधरी मिंधे गटात जाणार याची कुणकुण लागताच मी बेचैन झालो.माझे वडिल वारले तेंव्हा मी अश्रूंचा बांध रोखला होता पण राजेंद्र चौधरी फुटणार हे समजताच मी माझे अश्रू रोखु शकलो नाही,इतके अपरिमित दुख: झाले.विश्वास तरी कोणावर ठेवायचा ?
परंतू एक चौधरी गेले म्हणुन शिवसेना पोरकी होणार नाही. उलट गवताला भाले फुटतील,आमच्या सारखे ज्येष्ठ शिवसैनिक पुढे सरसावतील.बाजी प्रभू देशपांडेंच्या निष्ठेने व त्वेषाने ही खिंड लढवू पण या गद्दारांचे मनसुबे उधळून लावु.
राजेंद्र चौधरींना मित्रत्वाचा सल्ला ! आपण मजबुरीने व ब्लॅकमेलिंगने शरणागती पत्करली हे मी जाणुन आहे. आपण मावळ्यांचा धर्म विसरलात.”सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नही” हा बाणा आपण बासनात गुंडाळून ठेवला.
वास्तविक तुमच्या हाती २५ वर्षे सत्ता आहे,संपत्ती आहे,शिवसैनिकांची प्रचंड ताकत व विश्वास होता पण एका केसच्या भीतीने आपण गर्भगळीत झालात. माझ्याकडे ना कोणते पद ना कोणती सत्ता ना कोणती संपत्ती पण मी झुकलो नाही व मरेपर्यंत झुकणार नाही ! हे त्या मिंधेला सांगा !
पुन्हा एक विनंती वजा इशारा -गेलात हरकत नाही पण रमेश चव्हाण सारखी चुक करू नका कोणतेही पद घेऊ नका व शिवसेना फोडण्याचा विचारही मनात आणू नका ! तुमचा रमेश चव्हाण करायची वेळ माझ्यावर आणू नका ! जर एकनाथ शिंदे तुमचा गंभीर गुन्हा दाबुन तुम्हाला वाकवत असेल तर मी काही कमी नाही.सत्ता पैसा मनुष्यबळ काहीही नसताना लेखणी वाणीच्या बळावर मी ती दाबलेली केस ओपन करू शकतो, ही अतिशयोक्ती वाटत असेल तर एकनाथ शिंदेंना सांगा की मला अजमावून बघा !
एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री असाल,आपल्याला महाशक्तिचा वरदहस्त असेल पण निष्ठेपुढे सर्व कस्पटासमान असते.आपण आमच्या श्रद्धास्थानांना पक्ष प्रमुखांना व निष्ठावंताना दु:खाच्या डागण्यांवर डागण्या देत आहात. पुत्र वियोगाने श्रावणाच्या माता पित्यांनी दशरथासारख्या अयोध्यापतीस शाप दिला व पुत्रवियोगाने तो मेला.आपण शिवसेनेच्या कोट्यावधी श्रावण बाळांचे शिव्याशाप घेत आहात, ते तुम्हाला नक्कीच भोवणार ! आपल्या डोळ्यासमोर दोन मुलं बुडताना आपणांस जे दुःख झाले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दु:ख पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व निष्ठावंत शिवसैनिकांना आपण देत आहात.नियती कधी उधारी ठेवत नाही,वेळच्या वेळी हिशेब चुकता करते. हा आतंकवाद थांबला तर तुमचेच पापक्षालन होईल अन्यथा जे होईल ते आम्हाला देखील पाहवणार नाही !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक व पत्रकार