June 29, 2025 8:57 pm

राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीच्या आणि सरपंचपदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीच्या आणि सरपंचपदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान

राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असून, त्यासाठी प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातल्या 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यातल्या सत्तातरानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्यानं त्याबद्दल विशेष उत्सुकता आहे. सरपंचपदाच्या 246 जागांसाठी 648 उमेदवार रिंगणात आहेत. आज या निवडणुकीनिमित्त संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील बाजार बंद राहणार आहेत.

सांगली जिल्ह्यात 452 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातल्या 29 ग्रामपंचायतींच्या तसंच 38 गावांच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणसाठी निवडणूक आयोगानं 5 गावातली निवडणूक थांबवली आहे, या ठिकाणी पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका होणार आहेत. दरम्यान काल सांगली जिल्ह्यातल्या नरवाड इथं भरारी पथकानं छापा घालून ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या आणि पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या.

नंदुरबार जिल्ह्यातल्या 123 ग्राम पंचायतींसाठी आज निवडणुका होत असून यातल्या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. हा भाग दुर्गम असल्यामुळे जिल्ह्याच्या सर्व सहा तालुक्यात मतदान साहित्य यापूर्वीच मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यात 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र विविध कारणांमुळे आज त्यापैकी 190 ग्रामपंचायतींसाठीच मतदान होत आहे.

धुळे जिल्ह्यातल्या 128 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.बुलडाणा जिल्ह्यात 259 ग्रामपंचायतींसाठी 842 मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडणार आहे. मतदान यंत्र आणि अन्य सामुग्रीसह निवडणूक कर्मचारी कालच गावा गावात दाखल झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या 325 पैकी 32 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 293 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. एकंदर 933 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात आज होत असलेल्या मतदानासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी ही सुट्टी लागू आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 166 ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक होत आहे.यात उस्मानाबाद तालुक्यातल्या 45, तुळजापूरमधल्या 48, उमरग्यातल्या 23, लोहारातल्या 12, कळंबमधल्या 30, वाशीतल्या चार, भूममधल्या दोन तर परंडा तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यासाठी 658 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातल्या 266 ग्रामपंचायतींच्या तसंच 258 सरपंचपदाच्या निवडणुका होत आहेत. जाहीर झालेल्या 266 सरपंचपदाच्या निवडणुकांपैकी चार सरपंचांची निवड बिनविरोध झाल्यानं आणि चार जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं होणाऱ्या 258 सरपंच पदाच्या निवडणुकांसाठी 936 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!