धन्यवाद धन्यवाद धन्यवाद …. धन्यवाद अमळनेरकरांनो -पो. नि. जयपाल हिरे
जेमतेम २० महीने नोकरी निमित्ताने मी अमळनेर येथे आलो पण आज आपल्यासोबत २० वर्षापासून जोडला गेलोय अशी अनुभुती होत आहे. एखादा मुलगा नोकरी वा व्यवसाय निमिताने परगावी जातो तेंव्हा त्याला स्वतःचे गाव सोडण्याचे होणारे जे दुःख असते तश्याच काहीशा भावना माझ्या अमळनेर सोडतांनाच्या आहेत. पोलीस निरिक्षक म्हणून आपण माझा जो सन्मान केला तो मी कधीच विसरू शकणार नाही. जातीय- धार्मिक सलोखा टीकवितांना वा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना आपण पोलीसांवर जो विश्वास दाखवला त्यामुळेच मागील दोन वर्ष अमळनेर शहर शांत राहीले. चो-यांना प्रतिबंध असो वा गुन्ह्यांची उकल असो, दामिनी पथकाची कामगीरी असो वा गाव गुंडावर केलेल्या कारवाया असो, यात्रा सण-उत्सव-जयंती साजरे करणे असो वा CCTV कॅमेरे बसविण्याचा उपक्रम असो, क्रिडा सांस्कृतीक उपक्रम असो वा शहरातील पोलीस चौकयांचे नुतनीकरण करण्याचा निर्णय असो. आपण सर्वांनी सहभाग नोंदविला व पोलीस विभागास ही आपल्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले. आपल्या अनमोल सहकार्यामुळे व पत्रकार बांधवांच्या सकारात्मक पत्रकारीतेमुळे जनसामान्यात पोलीस विभागाची चांगली प्रतिमा निर्माण करता आली व जनतेचा विश्वास संपादन करता आला. अमळनेर शहरात यशस्वीरीत्या काम केल्याची पावती म्हणूनच मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांनी मला जिल्ह्यातील सर्वात आव्हानात्मक व मोठ्या अशा MIDC पोलीस स्टेशनची जबाबदारी दिली आहे. माझ्या व्यावसायीक पोलिसिंग च्या दृष्टीने माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे तसेच मुलींचे शिक्षण व कौटुंबीक दृष्ट्याही जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने ही बदली मला सुकर असणार आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहील…..
- जयपाल हिरे