खोक्यावरून भांडू लागले बोके
तरी मुख्यमंत्री म्हणतायत सब ओके !
पन्नास खोके सर्व काही ओके ! हा आता परवलीचा शब्द झाला आहे. गद्दारीची चर्चा इतकी तळागाळातील जनतेत रुजली आहे की, आत्ता तर लहान मुलंही “ते “आमदार दिसले की,हा बघ, खोकेवाला आला ! असे एकमेकांना खुणावू लागतात. इतकंच नव्हे तर जेंव्हा हे आमदार लग्न वा तत्सम कार्यक्रमात जातात, तेंव्हा लोक कुजबुजत असतात- बघ तो गुवाहत्तीवाचा खोकेवाला आला.
आत्ताच सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात जेंव्हा त्यांच्याकडे वर्गणी- देणगी मागायला कार्यकर्ते जात होते,तेंव्हा पाच-दहा हजार देणा-या खोकेबाजा लोकप्रतिनिधींकडे ते रागाने पाहत होते.तुम्ही 50 खोके घेतले तर किमान एक तरी पेटी द्यायची, अश्या भावनेने कुत्सितपणे या खोकेबाज म्हणून बदनाम झालेल्या लोकप्रतिनिधीं बाबत उद्गार काढून दुषणं देत.
आमदार रवी राणा व आमदार बच्चु कडू यांच्यात खोक्यावरून रंगलेले नाट्य मिंधे सरकारच्या विश्वसनीयतेची YZ करून टाकत आहे. आव्हान – प्रतिआव्हानामुळे जनतेची करमणूक होते व जनतेचे गंभीर विषयांवरून लक्ष विचलित होत असेल तर चांगलेच आहे,असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना वाटत असेल.
विरोधक आत्ता यांच्यात लागली,म्हणून टाळ्या पिटत असतील,असे शिंदे फडणवीस मनातल्या मनात म्हणत असतील.
राणा म्हणतात बच्चु कडूंनी गुवाहत्तीला खोके घेतले ते तोडबाज आहेत,त्यांनी पन्नास गुन्हे दाखल केले तरी मी घाबरत नाही.या उलट बच्चुभाई म्हणतात, राणांनी आपले आरोप सिध्द करावेत,
पुरावे द्यावेत,नाही तर मी एक तारखेला काय करायचे करेन.आठ आमदार माझ्या सोबत आहेत!
आधीच बच्चु कडू हे एकनाथ शिंदेंवर कमालीचे नाराज आहेत.सर्वात आधी बंडात सामिल होऊन व स्वतः सोबत 10 अपक्ष आमदारांची रसद पुरवत शिंदेच्या गद्दारीला बळ दिले, याचे श्रेय कोणी हिरावून घेऊ शकत नाही.त्यामुळे मंत्रीमंडळात त्यांचा सर्वात आधी समावेश होणे,नैसर्गिक न्यायास धरून होते.त्यामुळे बच्चु कडू व त्यांचे सहकारी नाराज असणे स्वाभाविक आहे.
महा विकास आघाडीत राज्यमंत्रीपदी असलेले बच्चु कडू हे आपल्या मंत्रीपदावर तुळशीपत्र ठेऊन कॅबिनेट मंत्रीपदाच्या आशेने मिंधे गटात सामिल झाले,मग त्यांना मिंधे सरकारमध्ये स्थान न मिळणे,अन्यायकारकच आहे.त्यामुळे बच्चु कडुंची नाराजी अनाठायी नव्हतीच.
आत्ता तर राणांनी बच्चु कडुंच्या भळभळत्या जखमेवर मीठच चोळले आहे. बच्चु कडू यांनी राणा यांना आव्हान देतान 1 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे.त्याचवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस बजावून खोके दिले असल्यास स्पष्ट करा,असे म्हटले आहे.
हे मात्र विचित्र वाटते. एखाद्या विवाहित महिलेस तिची कौमार्य चाचणी करून शिलवान असल्याचे सिद्ध करावयास सांगण्यासारखे आहे. एखाद्या बाहेरख्यालीस ती पतीव्रता असल्याचा पुरावा देण्यास सांगण्यासारखे आहे.
जे गुवाहत्तीला गेले ते सर्वच हरिश्चंद्राचे अवतार नव्हते. बहुतांश आमदार या आमिषाला बळी पडले,याबद्दल दुमत असू शकत नाही.हमाम खान्यात सर्वच नंगे असतात पण बाहेर मात्र सुटाबुटात वावरत असतात.पा़ंढ-या शुभ्र पेहरावर जे काळे डाग असतात ते अदृश्य असतात,ते सर्व सामान्य लोकांना दिसतात पण या राजकारण्यांना स्वतःला दिसत नसतात.
बच्चु कडू यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पेचात पकडले आहे. खोके दिले घेतले हे ते जाहिरपणे बोलू शकत नाहीत, हे बच्चु कडू जाणून आहेत.भ्रष्टाचाराचा कोणी धनी नसतो. पण दिल्या घेतल्याशिवाय इतके आमदार फुटू शकत नाहीत,हे कोणीही सुज्ञ समजू शकतो. दसरा मेळाव्याला हजार रुपयांत बसेस भरून व कोट्यावधीची उधळण करून माणसांची गर्दी जमवणारे, तीन लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार फुकटात चणे फुटाण्यावर फुटतील का? आर्थिक गैरव्यवहार व आमिषांची खैरात केल्याशिवाय हे फुटाणे फुटूच शकत नाही,हे मिसुरडं न फुटलेलं पोरही सांगेल.
तेंव्हा बच्चु भाई कडू तुमचे आव्हान ना राणा स्विकारेल,ना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्विकारतील,एक मात्र नक्की, बच्चुभाई कडू यांच्या बंडोबाचे थंडोबा करण्यासाठीआगामी मंत्रीमंडळात मंत्रीपदाची बक्षिसी नक्की पदरात पडेल. त्याबरोबरच राणाचा बाणा गळून पडेल तर बच्चुभाई मंत्रीपदाची माळ,गळ्यात पडताच गलितगात्र होतील.
जनतेला मुर्ख बनवण्याची अजून एक खेळी यशस्वी होईल. जनता मुक दर्शक बनुन हतबलतेने हा तमाशा पाहत राहिल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470