दसरा मेळाव्यातील एकनाथ
शिंदेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फुटली !
शिवसेनेतून फुटलेले एकनाथ फुटाणे यांच्या दुस-या प्रती मेळाव्यातील भाषणाची स्क्रिप्ट त्यांच्या प्रमाणेच फुटून त्यांच्या दुर्देवाने माझ्या हाती लागली. ती येणे प्रमाणे-
जमलेल्या तमाम बा़धवांनो, मी आज जे बोलेन ते माननीय पंतप्रधान मोदी साहेब, आमचे भाग्यविधाते अमितभाई शहा व जे कधीही काहीही करू शकतात असे माझे मध्यरात्री वेषांतर करून भेटणारे देवांचे देव देवेंद्र फडणवीस साहेब यांना स्मरून बोलणार आहे. इथे माझे राजकिय जन्मदाते कोण ? याचा काही संबंध नाही. कारण मुलांना जन्माला घालणं यात मोठा पराक्रम नसतो तर एका गुणवान, महत्वाकांक्षी मुलाचे गुण ओळखून व अवगुणांवर पांघरून घालून जो त्याला मान,सन्मान,खोके व इतर बरेच काही देतो तोच खरा जन्मदाता. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य रिक्षा चालकाला व शेतक-याच्या मुलाला थेट मुख्यमंत्री करणारे हेच खरे भाग्यविधाते आहेत. मॉ कामाख्या देवीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याने ती पेग्वीन सेना व उरली सुरली शिल्लक सेना आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही.त्याच बरोबर दिल्लीतील महाशक्ति जीने पाकिस्तानला पाणी पाजलं, ती आमच्या पाठीशी असताना, इडीची आम्हाला भीति नाही, आयटीवाले, सीबीआयची काय बिशाद आमच्या कुठल्याही केसाला हात लावायची ? (टाळूला चिकटलेला च्युईंग गम चघळत थोडा पॉज)
ते आम्हाला गद्दार म्हणतात,पण माता कामाख्या देवीला स्मरून सांगतो,आम्ही गद्दार नाही हो ! आम्ही खुद्दार आहोत खुद्दार !! आम्हाला बंडखोर म्हणतात पण खंडोजी खोपडेची शप्पथ, आम्ही बंडखोर नाही, आम्ही बंड केले नाही तर उठाव केला.त्यांना काय ते काहीही आरोप करतात. तिकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही.आधी मला माझ्या 40 आमदार व 12 खासदारांची सोय लावायची आहे,दिल्लीश्वराची मर्जी सांभाळत त्यांची राजकीय सोय लावे पर्यंत मला चैन पडणार नाही.( सर्वजण आलेत का ते पाहत समोर नजर फिरवत)
अहो खरं सांगतो, ती तुमची दही हंडी फोडणं परवडलं पण ही पन्नास थरांची हंडी सांभाळणं महाकठीण काम आहे.सद्या मंत्री मंडळ विस्ताराचं गाजर दाखवून मी त्यांना थोपवून ठेवले आहे पण हे किती दिवस करणार ? आत्ता कामाख्या देवीच यातून मार्ग काढून दिल्ली पतपात शहांना सुबुद्धी देवो व किमान 30 मंत्रीपदं आमच्या गटाला देवो तरच आमचं सरकार घोडदौड करू शकेल. ( मनातल्या मनात शहा मोदींचे स्मरण करतात.)
तर जमलेल्या व बस प्रवासाने दमलेल्या महाराष्ट्रातून आणलेल्या माझ्या बांधवांनो, मला तुमच्या परिस्थितीची कल्पना आहे. सुरत गुवाहत्ती व गोवा असा प्रवास करताना माझी विमान प्रवास करूनही किती दमछाक झाली होती! त्यामुळे मला आपल्या परिस्थितीची कल्पना आहे.
मी मुख्यमंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री सारखी लुडबुड करीत असतात,मला डॉमिनेट करून शायनिंग मारत असतात.पण मी यांना पुरून उरेन.फक्त आत्ता माझा हात दगडाखाली आहे म्हणून नाहीतर यांना पण शिंदेबाणा दाखवला असता.(पुन्हा तोंडातील च्युइंगगम चघळण्यासाठी पॉज घेतात)
आत्ता मी मुख्यमंत्री झालो आहे, त्यामुळे काळजी करू नका. मला धमकी आली होती पण ती खोटी निघाली ही पुन्हा एकदा कामाख्या देवीची कृपा.पण जे होते ते चांगल्यासाठीच.कारण माझी सिक्युरिटी अजून टाईट झाली.मी असल्या धमक्यांना का घाबरावे ? मी अशा धमक्यांना भिक घालत नाही,इतकी सिक्युरिटी टाईट आहे. ( दाढी कुरवाळत सिक्युरिटी असल्याची खात्री करून घेतात)
आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहोत,बाळासाहेबांची शिवसेना आम्हीच पुढे नेत आहोत.दिघे साहेबांचा टेंभी नाका व आनंद आश्रमपण आमचाच आहे. कारण दिघे साहेब वारले तेव्हा मीच त्यांचा मृतदेह खांद्यावरून जळत्या आगीशी सामना करत खाली आणला होता व मेल्यानंतरही त्यांचे रक्षण केले होते ! मग सांगा दिघे साहेबांचे वारसदार कोण ? बरोबर मीच ना ! ( मोदी सहवासाचा परिणाम )
जो पर्यंत मी मुख्यमंत्री आहे तो पर्यंत कोणी काळजी करू नये,गोविंदा मेला तर दहा लाख,इमारती खाली चिरडला गेला तर पाच लाख, अशा असंख्य योजना माझ्या सुपिक डोक्यात आहेत. मदत अनुदान व घोषणा देण्यात मी कुठेच कमी पडणार नाही.फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या.
आम्ही सेना भवनवर दावा केला तो काय आमच्यासाठी, अहो,तिथे बसून आम्हाला जनतेची सेवाच करायची होती. आम्ही खरी शिवसेना आमची म्हणतो त्यात आमची काय चुक ? राहिल त्याचे घर व कसेल त्याची जमीन ! हा कायदाच आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे उगाच बाळासाहेबांवर आपला हक्क सांगत सुटले आहेत. आमचा बाप कोण ? हे ठरवायचा अधिकार आम्हाला घटनेनेच दिलेला आहे. आत्ता धनुष्यबाण आम्ही मागितले आहे पण ते आम्हाला मिळाले नाही तर गोठवले तरी नक्की जाईल. *बाळासाहेबच बोलले होते, मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या ! मग सांगा, बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चाललो आहोत की नाही ?? मग बाळासाहेबांचे खरे वारसदार आम्ही आहोत की नाही,तुम्हीच ठरवा ! बोला आहोत की नाही ? ( पुन्हा एकदा गालात अडकलेला च्युइंगगम चघळतात )
बांधवांनो, मला पदाचा मोह नव्हता व नाही.पण आधी बाळासाहेब व नंतर उद्धव ठाकरे आणि आत्ता अमितभाई बळजबरीने मला पदं देतात, तर मी त्यांना नाही कसे म्हणू ? ते महाराष्ट्राच्या संस्कृतीस शोभत नाही. शिवरायांच्या काळातही फितुरांना गावं,संस्थानं इनाम दिली जायची. तुम्ही खुप दूरवरून आलात याची मला कल्पना आहे परंतू मी आमच्या सर्व आमदार-खासदारांना व पदाधिका-यांना बजावले आहे, ते तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.यावरूनच आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत; याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. (समोर पाहतात तर गर्दी ओसरू लागली आहे,आपली बस सुटली तर पदरमोड करून परत जावे लागेल ही चिंता त्यांना भेडसावत असावी.)
मी तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहणार नाही परंतू एकच सांगतो, एकदा का शिवसेना आमची झाली,धनुष्यबाण गोठवले गेले तर आपण यापेक्षा मोठा विजयी मेळावा घेऊ ! तत्पुर्वी माननीय बाळासाहेब व मिनाताईंच्या चरणी हा विजय अर्पण करून प्रथम दिल्लीत मोदीजी व शहांना कुर्निसात करून नंतर मॉ कामाख्या देवीकडे नवस फेडायला जाऊ ! जय दिल्ली,जय,मोदी शहा व जय कामाख्या देवी !!
शब्दांकन – दिलीप मालवणकर
9822902470
3 ऑक्टोबर 2022