करमाळा प्रतिनिधी :- नुकतीच करमाळा तालुक्यातील शासकीय समितीवरील विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. सदर नियुक्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला तालुका उपाध्यक्षा राजश्री कांबळे यांनी नाराजी व्यक्त करत सर्व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला आहे. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, राजकारण म्हटले की जवळपास बहुतांश महिला या मागे फिरतात कोणीही उंबऱ्याच्या बाहेर येऊन काम करण्यास धजावत नाहीत. परंतु मी जवळास मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादी चे कार्य तळागाळा पासून करीत असून राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमास, आंदोलनास, बैठकीस उपस्थित असते. कोविडच्या काळात मी जीवाची v कुटुंबाची पर्वा न करता समाजसेवा केलेली आहे. समिती निवडी आगोदर आम्हाला नावे देण्याबाबत कळविले होते त्यानुसार आम्हीही आमची नावे समितीसाठी दिली होती परंतु मी फक्त एक मागासवर्गीय महिला असल्याने मला या समित्यांमधून डावलले गेले असल्याचे समजते.
परंतु ज्या ७०% महिला कधीच उंबरा ओलांडून पक्ष कार्य असो अथवा महिलांचे विविध प्रश्न सोडविणे असो असे कार्य कधीही केले नाही अशांना समित्यामध्ये पदे देऊन एक प्रकारे आमच्यासारख्या मनापासून पक्षासाठी, महिलांसाठी कार्य करणाऱ्याना तुम्ही घरीच बसा असे तर अप्रत्यक्षरीत्या सूचित केले नसेल ना? हा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो आहे. ज्यांचे पुरुष राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या महिलांना पदे देऊन काय पुरुष महिलांची कामे करणार आहेत का? असा ही प्रश्न यावेळी कांबळे यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पक्षातून बाजूला करण्याचा हा कुटील बेत असून याबाबत वरिष्ठांनी वेळेत लक्ष द्यायला हवे अन्यथा करमाळा तालुक्यात पक्षाची खूप मोठी हानी होऊ शकते व परिणामी कार्य करणाऱ्या महिलांची मुस्कटदाबी होऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होईल. तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीत ही अशाच पद्धतीने पक्षाचे कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या इच्छुक महिलांना याचा त्रास होईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे. शेवटी बोलताना त्या म्हणाल्या की, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे तो मी बजावित आहे.