१११ व्या वेळेस रक्तदान करणाऱ्या गणेश शिंगारे यांचा जीवनदानाचा विक्रम – सर्पमित्र, समाजसेवक आणि मानवतेचा तेजस्वी दीप
अमळनेर : विक्की जाधव
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उक्तीला खरा अर्थ देत गणेश शिंगारे यांनी दिनांक १६ मे रोजी १११ व्या वेळेस रक्तदान करून एक प्रेरणादायी विक्रम नोंदवला. नगर परिषद अमळनेर आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
नगर परिषद अमळनेरच्या पाणीपुरवठा विभागात फिल्टर इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले गणेश शिंगारे केवळ रक्तदाता नाहीत, तर एक नामांकित सर्पमित्रही आहेत.
सख्या सात बहिणींचा एकुलता एक आठवा भाऊ असलेले गणेश शिंगारे यांनी आजवर ५,५०० हून अधिक सर्पदंशग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत. त्यांनी अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून असंख्य साप आणि वन्यजीवांचे प्राण वाचवले आहेत.
सेवा, निस्वार्थता आणि धाडसाचा संगम
वयाच्या अठराव्या वर्षी, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी रक्तदानास सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी सातत्याने रक्तदान करत २७ वर्षांत १११ वेळा रक्तदानाचा विक्रम प्रस्थापित केला.
एका प्रसंगी, सर्पदंश झालेल्या मित्रावर उपचार करत असताना व नंतर त्याच्या भाचीसाठी तातडीने रक्ताची गरज भासल्यावर, डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन पुन्हा रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडवले.
कोविड काळातील समर्पित सेवा
कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये सेवा देताना त्यांनी अनेक वृद्ध व रुग्णांना मानसिक आधार दिला. घाबरलेल्या रुग्णांना स्वतःच्या हाताने अन्न खाऊ घालणे, संवाद साधून त्यांना धीर देणे – हे सगळं त्यांनी अत्यंत माणुसकीने पार पाडले. यासाठी तत्कालीन प्रांताधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
देहदानाचा संकल्प – सेवावृत्तीचा सर्वोच्च टप्पा
गणेश शिंगारे आणि त्यांच्या पत्नी किरण शिंगारे यांनी दोघांनीही देहदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या सेवावृत्तीचा हा सर्वोच्च टप्पा मानावा लागेल. त्यांनी आजवर रक्तदानामुळे मिळणाऱ्या कोणत्याही सवलती स्वतःसाठी वापरल्या नाहीत, तर त्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या.
नगर परिषदेचा गौरव
मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर म्हणाले, “गणेश शिंगारे यांच्यासारखा सेवाभावी कर्मचारी आमच्यासाठी गौरवाचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण नगर परिषदेचा सन्मान वाढला आहे.”
गणेश शिंगारे हे केवळ एक कर्मचारी नाहीत, तर समाजासाठी समर्पित, हिरकणीच्या भावनेने झपाटलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या कार्याची अधिकृत स्तरावर दखल घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीस बळ द्यावे, हीच समाजाची आणि प्रशासनाची अपेक्षा आहे.