युद्धाच्या पार्श्वभूमीवर IMF कडून पाकिस्तानला 8 हजार कोटींची मदत – भारताचा तीव्र निषेध
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी/वर्षा चव्हाण)
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून पाकिस्तानला तब्बल 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8 हजार कोटी रुपये) मदत मंजूर करण्यात आली आहे. हा निर्णय भारतासाठी संतापजनक ठरला असून, भारताने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडून पाकिस्तानला मिळालेला जोरदार प्रत्युत्तर आणि सैनिकी दडपशाहीमुळे हैराण झालेल्या पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मदतीसाठी हात पसरवायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान IMF कडून मिळालेली मदत पाकिस्तानला तात्पुरता दिलासा देणारी असली तरी भारताने याला “धोरणात्मक अपयश” आणि सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब म्हणून हेरले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने IMF कडून मिळालेली ही मदत “विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल” असल्याचा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर, भारताच्या दबाव धोरणाला हे अपयश असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
भारताने यावर कडक भूमिका घेतली आहे. भारताचे म्हणणे आहे की, याआधीही पाकिस्तानने IMF कडून मिळालेल्या निधीचा लष्कर आणि दहशतवादी गटांच्या पोसणुकीसाठी गैरवापर केला आहे. त्यामुळे ही मदत केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक असल्याचे भारताने स्पष्टपणे सांगितले.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नाते अत्यंत तणावपूर्ण आहे. अशा काळात IMF कडून पाकिस्तानला मदतीची रक्कम दिली जाणे ही भारतासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. यामुळे जागतिक संस्थांनी अशा निर्णयांवर पुनर्विचार करावा, अशी जोरदार मागणी भारताकडून करण्यात येत आहे.