सीमेवरील तणाव वाढला; मुंबईत हालचालींना वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक
मुंबई(विशेष प्रतिनिधी/वर्षा चव्हाण)
भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री पाकिस्तानी सैन्याने भारताच्या विविध ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर देशभरात तसेच महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यभरात सुरक्षेचे स्तर वाढवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, पोलीस दल सतर्क ठेवण्यात आले आहे. पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे तसेच धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची उच्चस्तरीय आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर विभाग आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उपस्थित आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील उपाययोजना या बैठकीत ठरवण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारकडून नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस विभागाला देण्यात आले आहेत.