तीनशे वर्षांची परंपरा अनंत भक्तीचा ठेवा संत सखाराम महाराज यात्रा आता नव्या रूपात रथ ट्रॅक्टर ने ओढला जाणार
अमळनेर : विक्की जाधव
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरच्या मातीतील श्रद्धेचा झरा, संत सखाराम महाराज यांची यात्रा — तीनशे वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेली ही यात्रा म्हणजे एकत्वाची, भक्तीची आणि परंपरेची अमूल्य साखळी. तर मानाची पहिली मोगरी म्हणून मुस्लिम बांधव रथाला पहिली मोगरी लावतात. जात, धर्म, लिंग हे सारे भेद विसरून हजारो भक्त निखळ श्रद्धेने दरवर्षी या यात्रेला सामील होतात.
परंतु यावर्षीच्या यात्रेला एक नवा वळण मिळालं आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन, संस्थानने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परंपरेप्रमाणे मानवी ओढ्याने ( दोरी ने ) रथ न ओढता, ट्रॅक्टरद्वारे रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे.
हा निर्णय घेताना संस्थानने परंपरेला सन्मान दिला, पण भावनिकतेला जबाबदारीची जोडही दिली. गर्दीतील धक्काबुक्की, महिलांची असुरक्षितता, पोलिसांची धावपळ आणि संभाव्य दुर्घटनांचा धोका पाहता, ट्रॅक्टरद्वारे रथ ओढणे ही काळाची गरज बनली आहे.
“श्रद्धा टिकली पाहिजे, पण तिच्यात शहाणपणही असावं,” हे संस्थानचं धोरण भाविकांना ही नव्या योजनेची साद घालते. दर्शनाचे मार्ग खुले राहणार आहेत, भक्तीचा ओघ तसाच अखंड वाहणार आहे, फक्त स्वरूप थोडं बदललं आहे.
या बदलाला पाठिंबा देऊन, प्रत्येक भाविकाने प्रेम, समज आणि सहकार्य दाखवावे — हीच या नव्या अध्यायाची खरी सुरुवात ठरेल.
स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद
गावातील अनेक जेष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “रथ ओढणं हे आमचं भाग्य आहे, पण ते सुरक्षित असायला हवं. ट्रॅक्टरने ओढला तरी आमचं भक्तीभाव कायम राहील,” असं एका महिला भाविकाने सांगितलं. तर एका ज्येष्ठ नागरिकाने नमूद केलं, “परंपरा ठेवूनही काळाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. जेव्हा रथ ओढताना कोणालाही त्रास होतो, तेव्हा श्रद्धा कुठे टिकते?”
पोलीस यंत्रणेची तयारी
यात्रेदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही, आणि ड्रोनच्या साह्याने रथाच्या मार्गावर लक्ष ठेवण्यात येईल.
संस्थेचे आवाहन
वाडी संस्थानने सर्व भाविकांना आवाहन केलं आहे की, “संतांच्या मार्गावर चालताना संयम, समजूतदारी आणि सहकार्य हीच खरी सेवा आहे. आपली परंपरा जपत ही यात्रा शांततेत पार पाडूया.”
नवीन पर्वाची सुरुवात
या यात्रेच्या नव्या अध्यायाला केवळ एक तांत्रिक बदल समजून न घेता, ती सामाजिक सुधारणा मानावी लागेल. हे एक उदाहरण ठरू शकते की परंपरेत बदल करतानाही श्रद्धेची अखंडता राखता येते.
पत्रकार,विक्की जाधव. 9175050300