अमळनेरात बोगस रेशन दुकानांचा पर्दाफाश – सुरेश पाटील यांचा उपोषणाचा इशारा अधीकाऱ्यांचे दुर्लक्ष..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील बोगस रेशन दुकानांचा मोठा भांडाफोड झाला असून, बंद पडलेल्या सेवाभावी संस्थांच्या नावे धान्य उचलून शासनाचा निधी लाटल्यांचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकारात सात्री गावचे सरपंच महेंद्र बोरसे यांचे नाव पुढे येत असून, त्यांनी निष्क्रिय संस्थांच्या नावाने दुकानं चालवून शासनाची फसवणूक केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी अद्यापही योग्य ती कारवाई न झाल्यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी १ मे रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पाटील यांनी महाराष्ट्र अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे तक्रारी सादर केल्या होत्या.
धर्मादाय आयुक्तांच्या चौकशीत ‘छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय मंडळ, सात्री’ आणि ‘निर्मलाई फाउंडेशन, सात्री’ या दोन संस्थांची मान्यता अनुक्रमे ५ मे २०१८ व २३ फेब्रुवारी २०२२ रोजी रद्द झाल्याचे निष्पन्न झाले.
तरीही या संस्थांच्या नावावर सात्रीतील दुकान क्रमांक १०१, मुडी येथील दुकान क्रमांक १११, आणि अमळनेरमधील ‘रिद्धी सिद्धी महिला बचत गट’ अंतर्गत दुकान क्रमांक ४ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, या बचत गटातील एक सदस्या रीना विनोद बोरसे असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांनी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून, प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाहीत, तर ते १ मेपासून उपोषण सुरु करणार आहेत.
तालुक्यातील जनतेचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे.