कडू कारल्याप्रमाणे आरोग्यवर्धक डोस देणारे : शांताराम निकम
समाजात बोलघेवडे लोक खुप असतात,गोड बोलून विश्वास संपादन करून घात करणारे घातकी लोक पावलोपावली आढळतात.राजकारणी तर स्वप्नं विकणारे सौदागरच असतात. त्या शिवाय त्यांना यशाचे शिखर गाठताच येत नाही.
अशा या व्यवहारी व भूलभुलैयाच्या विश्वात एक वेडा सामाजिक कार्यकर्ता “कडू डोस” पाजणे हे आपले कर्तव्य मानतो, विशेष म्हणजे राजकारणात असूनही तो स्पष्टवक्ता आहे. गोड गोड बोलून लोकांचे गळे कापण्याच्या या राजकिय वातावरणात तत्वांशी कोणतीही तडजोड न करता राजकारण समाजकारणात यशस्वी होण्याची किमया करणारा अवलिया म्हणजे शांताराम निकम सर होय.
हो शांताराम निकम हे पेश्याने शिक्षक आहेत. या पेश्याला देखील त्यांनी वेगळा आयाम दिला आहे.ते समर्पित भावनेने ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य बजावत आहेत. आपली शाळा हे ज्ञानमंदिर मानून ते त्या शाळेशी एकरूप होताना दिसतात.
शांताराम निकम यांचे वाचन अफाट आहे. तसेच ते जेव्हा लेख लिहितात किंवा कविता करतात तेव्हा त्यात कुठेही लेखकाचा अहंभाव डोकावत नाही तर तिथेही ते एक शिक्षक व समाज सुधारकाची भूमिका बजावत असतात. आपले मुद्दे ठासून सांगण्यासाठी ते अनेक उदाहरणांचे दाखले देतात. आपला मुद्दा वाचकांना पटवून दिल्याखेरीज ते थांबत नाहीत.
उगाच काही तरी लिहायचे असे त्यांच्या बाबतीत घडत नाही.
त्यांच्या कथा देखील वाचनीय असतात. या कथा अप्रकाशित आहेत. त्यांचा जर “कडू डोस” प्रमाणे संग्रह प्रकाशित झाला तर ते कथा लेखक म्हणूनही साहित्यविश्वात नावारूपास येतील. कडू डोसच्या प्रकाशनाप्रमाणे या कथा संग्रहाच्या प्रकाशनास सर्वतोपरी सहकार्य करण्यास मी तयार आहे.
जगात गोड बोलून नावारूपास येणारे लोक हजारोंनी सापडतील परंतू समाजाला कडू डोस पाजून नावारूपास आलेली एकमेव व्यक्ति सद्याच्या जमान्यात माझ्या पाहण्यात आहे, ती म्हणजे शांताराम निकम !
हल्ली श्री.शांताराम निकम यांना एक जगावेगळा छंद जडला आहे. सुखद वार्ता तर सर्वच देतात परंतू आपल्या शहरातील सर्व प्रकारच्या व सर्व थरातील व्यक्तिंच्या दु:खद निधनाची वार्ता निकम हे अतिशय तत्परतेने देतात. हल्ली फ्लॅट संस्कृतीमुळे आपल्या परिसरातील एखाद्या व्यक्तिच्या निधनाची माहिती मिळत नाही किंवा मिळालीच तर त्यास खुप उशीर झालेला असतो. परंतू निकम हे अशी माहिती तत्परतेने मिळवून ती सर्वत्र पाठवतात. कित्येक वेळा तर मृताच्या नातेवाईकांना देखील शांताराम निकम यांच्या माध्यमातून प्रथम माहिती मिळालेली असते. याच बरोबर ते मृत व्यक्तिची थोडक्यात माहितीही पुरवतात. अशी त्यांची ६५ वी कला आहे, असे वाटते.
मी नेहमी म्हणत असतो की, समाजाला जे पाहिजे ते देण्यापेक्षा ज्याची गरज आहे ते दिले पाहिजे. परंतू निवडणुकीच्या सौदेबाजीच्या राजकारणात हे तत्व अमलात आणणारे पराभूत होतात, मी दारूची मागणी करणा-या कार्यकर्त्यांना दारू पाजण्यास नकार दिला आणि १९९७ च्या निवडणूकीत पराभूत झालो समोरच्याने दारूचे कोठारच उघडून दिले आणि तो विजयी झाला, आज त्यावेळचे कार्यकर्ते अट्टल बेवडे झाले आहेत, काहींनी आपली जीवनयात्रा संपवली, अशा विजयापेक्षा पराभव पत्करला.हाच स्वभाव शांताराम निकम यांचा आहे.तत्वांशी तडजोड नाही तसेच आपल्या पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही, म्हणून त्यांनाही पराभव पत्करावा लागला होता.
एक लेखक, कवी, कथाकार, शिक्षक, पक्षनिष्ठ व तत्वनिष्ठ कार्यकर्ता, समाजसेवक, समाजसुधारक, प्रबोधनकार व सच्चा मित्र तसेच कुटुंबवत्सल असा मित्र लाभणे हे भाग्याचे असते, मी त्या दृष्टीने भाग्यवानआहे.
शांताराम निकम यांना वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा देताना दीर्घायुष्य, निरोगी व आरोग्य व ऐश्वर्यसंपन्न व सुख समाधानाचे आयुष्य लाभो ही सदिच्छा तसेच २०२४ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून यावेत, हीच सदिच्छा !
दिलीप मालवणकर