‘त्या अनवाणी पायांना सलाम!’
आमच्या देशाला जशी महान राजांची परंपरा आहे. तशीच थोर फकीरांचीही मोठी परंपरा आहे. बुद्धासारख्या राजपुत्रांनी राजत्याग करुन फकीरी पत्करली, तर सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, कुळवाडीभूषण शिवराय या राजांनी राजछत्राखाली राहूनही फकीरी आचरली.
प्राचीन काळी भगवान बुद्धापासून मध्ययुगात तुकोबांपर्यंत चालत आलेल्या फकीरी परंपरेचा, आधुनिक काळात गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील, या निसंगांनी निर्वाह केला.
गाडगे बाबांनी लोकशिक्षणाचे कार्य केलं, तर भाऊराव पाटलांनी शालेय शिक्षणाची गंगा गावोगावी पोहचवण्याचं महत्कार्य केलं. एकाने हाती गाडगं तर दुसऱ्याने खांद्यावर झोळी घेतली. आणि लोकांनीही गाडगं आणि झोळीत अशी भरभरुन भिक्षा वाढली, की राजांनीही तिचा हेवा करावा. पण या भिक्षेने त्यांचे जमीनीवरचे पाय किंचितही उचलले गेले नाहीत. इतकंच काय जनसेवेसाठी महाराष्ट्रभर गावोगावी वणवण हिंडणाऱ्या आपल्या पायांसाठी, साधी पायतानं घेण्याचा मोहही त्यांना झाला नाही.
दोन वेगवेगळ्या रंगाचे मोजे पायात घातलेल्या गाडगे बाबांचं आणि अनवाणी भाऊरावांचं खालील चित्र बघून, त्यांच्या पायांवर लोटांगण घालावे, अनं त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावावी असंच कुणालाही वाटेल.
भाऊरावांच्या शिक्षणसंस्थेचं अनुदान मुख्यमंत्री खेरांनी रोखलं, तेव्हा लाख रुपयाची मदत घेऊन गाडगे बाबा आधी हजर झाले. एक फकीर दुसऱ्या फकीराच्या मदतीला धावून गेला. अनं भाऊरावांना आश्वस्त करत म्हणाला, ‘हा गाडगे बाबा आहे तोवर तुला पैशाची कमतरता पडू देणार नाही. तुम्ही फार मोलाची सेवा करताहेत. मी माझ्या अंगावरच्या कातडीचे जोडे शिवून आपल्या पायात घातले, तरी आपल्या सेवेचं ऋण फिटणार नाही.’ भाऊरावांच्या कार्याचा यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता असेल! त्यामुळेच कदाचित भाऊरावांनी अनवाणी राहण्यातच धन्यता मानली असावी.
या लोकांनी स्वतःच्या त्यागाचं कधीही प्रदर्शन केलं नाही. कारण ते जे काही करत होते ते समाजावर उपकार करण्यासाठी नव्हे, तर समाजाच्या उपकारातून उतराई होण्याच्या भावनेतून करत होते.
आज उपकाराच्या भावनेतून सामाजिक कार्य करणारी माणसं, आपल्या तथाकथित त्यागाचं ओंगळ प्रदर्शन करताना जेव्हा दिसतात, तेव्हा मन खुप अस्वस्थ होतं. शिवरायांच्या या भूमीला चामड्याच्या वहाणांचा स्पर्श नको म्हणून, अनवाणी राहणारे एक बाबा आणि घरचा डबा विमानळावर खाऊन विमानप्रवास करणारं एक ‘समाजसेवी’ दांपत्य व त्यांचा उदोउदो करणारी चोंबडी माणसं पाहून संताप अनावर होतो. अखेर लोक ज्यांना भुलतात, त्यांना त्याच लायकीचे लोक भेटतात.
परवाज जालंदरींच्या काव्यपंक्ती आहेत
जिनके होंठों पे हंसी पांवों में छाले होंगे,
हां वोही लोग तेरे चाहनेवाले होंगे!
पायाला व्रण पडले तरी आपल्या चेहऱ्यावरचं हसू मिटू न देणारे, असे चाहनेवाले महाराष्ट्राला लाभले, म्हणून महाराष्ट्र पुरोगामी बनला. त्यांनी प्रशस्त केलेल्या राजमार्गाची आज संकीर्ण नागमोडी पाऊलवाट झाली आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे
या दोन्ही फकीरांनी आपली लोकप्रियता राजकारणात आजमावली असती, तर ते मोठे नेते झाले असते. मोठमोठी राजकीय पद त्यांच्याकडे चालत आली असती. पण सर्वांनीच राजकारण करायचे म्हटले, तर समाजपुरुष विकलांग होईल. कारण राजकारण आणि समाजकारण या समाजपुरुषाच्या शरीराच्या दोन भुजा आहेत. आज समाजकारणात कुणाला रस नाही. जो तो उठतो अनं राजकारण्यांच्या मागेपुढे गोंडा घोळत पुढारी होऊ पाहतो. राजकारण हा सेवेचा नव्हे तर करिअरचा विषय बनला आहे. हेच आजच्या अरिष्टांचे कारण आहे.
या दोन्ही फकीरांनी कुणालाही आपला वारस नेमला नाही. फकिराच्या गादीला रक्ताचा वारस नसतो, विचारांचा वारस असतो नि तोही त्याने त्यांचा वारसा चालवत सिद्ध करायचा असतो. या अनवाणी फकीरांना सविनय वंदन!
– सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.