भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस लवकरच दररोज होणार : रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे
मेल एक्सप्रेसला थांबा मिळावा व खान्देश एक्सप्रेस दररोज व्हावी, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी
शिरपूर : नरडाणा येथे गेल्या २५ वर्षापासुन परिसरातील व शिरपूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील नागरीकांची नरडाणा रेल्वे स्टेशनवर मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी आहे. तसेच भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस हि रेल्वे गाडी दररोज व्हावी अशी मागणी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी रेल्वेमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांची (दि.१२ नोव्हें) रोजी जालना येथे भेट घेवुन निवेदन देवुन मागणी केली आहे. अहमदाबाद हावड़ा एक्सप्रेस, नवजीवन चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस, ताप्तीगंगा सुरत पटना एक्सप्रेस, पुरी अहमदाबाद एक्सप्रेस, भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करण्यात यावी व भुसावळहून सायं. ६ ऐवजी रात्री ८ वाजता व बांद्राहून रात्री १२.२० ऐवजी रात्री १० वाजता करण्यात यावी, सुरत अमरावती सुपर फास्ट दररोज करण्यात यावी व नरडाणा येथे या गाडीला थांबा मिळावा, बोराणी अहमदाबाद एक्सप्रेस गाडीला नरडाणा येथे थांबा मिळावा. अशी मागणीचे निवेदन रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी जालना येथे भेट घेवुन दिले आहे. यावेळी सोबत नरडाणा परिसरातील रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य रविंद्र वाघ वारुड, कुणाल जाधव शिरपूर आदि उपस्थित होते. यावर रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी आश्वासन दिले की, लवकरच भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करण्यात येणार असे सांगितले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सुरत भुसावळ (प.रे.) वरील रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण करून ८०० प्लॅटफार्म करण्यात आले आहे. येथून जवळपास २० हून अधिक मेल एक्सप्रेसवे जातात. या रेल्वे गाड्यांना नरडाणा स्टेशनवर थांबा नसल्यामुळे १,२२००० प्रवाश्यांना लाभ न मिळाल्याने परिसरातील ३५ गावातील प्रवाश्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. येथे लवकरात लवकर मनमाड-धुळे-इन्दौर रेल्वे मार्गाचे जंक्शन स्टेशन होणार आहे. तरी देखील आज पर्यंत कोणत्याही मेल एक्सप्रेस रेल्वेला येथे थांबा नसल्यामुळे बरेचसे प्रवासी इतर रेल्वे स्टेशनवर जाण्याचा मार्ग अवलंबतात. आपल्याकडुन वरील विषयी प्रवाश्यांना योग्य तो न्याय मिळेल आणि वरील सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांना नरडाणा (प. रेल्वे) स्टेशनवर त्वरीत थांबा मिळावा व भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करण्यात यावी व भुसावळहून सायं. ६ ऐवजी रात्री ८ वाजता व बांद्राहून रात्री १२.२० ऐवजी रात्री १० वाजता करण्यात यावी. यासाठी आपण आपल्या स्तरावर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांचाकडे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केली आहे. त्यानुसार भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस हि गाडी लवकरच दररोज करण्यात येईल असे मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी आश्वासन दिले आहे. निवेदनाची प्रत रेल्वेमंत्री ना. अश्विनी कुमार वैष्णव नवी दिल्ली, खा. डॉ. सुभाष भामरे धुळे यांना हि पाठवण्यात आल्या आहेत.