महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी
तिन महिने मानधन रखडले राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांचे मार्च २०२२ पासून मानधन रखडले आहे.त्यामुळे त्यांच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाकडून अंगणवाडी सेविकांना ८५०० रुपये,मदतनिस ४५०० आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ५५०० रूपये दरमहा इतके अत्यल्प मानधन दिले जाते. सदर मानधन गेली तिन महीने रखडल्याने या विधवा,घटस्फोटीत महिला कर्मचाऱ्यांना घर कसे चालवावे असा यक्ष प्रश्न पडला आहे.
मानधन रखडल्याने त्यांचेवर कर्ज काढून घर चालविण्याची वेळ आली आहे.त्यातच दवाखाना,लग्न सराई सुरू असल्याने यासाठी येणारा जास्तिचा खर्च अटळ आहे.बहुतांश अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी आहे.त्यामुळे त्यांना रोज आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. रखडलेल्या मानधनाबाबत मंत्रालय तसेच आयुक्तालय,नवी मुंबई यांच्याकडे संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांनी सातत्याने प्रत्यक्ष भेटी घेऊन पाठपुरावा सुरू ठेवला असून अनेकदा निवेदने दिली आहेत.
याबाबत कधी निधी उपलब्ध नाही तर कधी प्रणाली बदलामुळे मानधन अदा करण्यात अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अंत पाहू नये आणि मार्च पासूनचे रखडलेले मानधन तात्काळ अदा करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची होणारी उपासमार थांबवावी अन्यथा अंगणवाडी कर्मचारी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे.