राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीशताब्दी दिन आहे. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामध्ये आज एकाच दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा आहे; अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं आहे.
आधुनिक शेती, सर्वांना शिक्षण, उद्योगांना प्रोत्साहन, कलेला आश्रय, मागास बांधवांना आरक्षण या त्यांनी दाखवलेल्या मार्गानंच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे, असं पवार यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे. शहरातल्या ५ ठिकाणाहून आणि प्रत्येक तालुक्यातून कृतज्ञता आणि समता फेरी काढण्यात येणार असून ती आज सकाळी साडेनऊपर्यंत छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापाशी पोहोचेल आणि त्यानंतर १० वाजता, १०० सेकंद स्तब्ध उभ राहून सर्वांनी लोकराजाला आदरांजली वाहावी, असं आवाहन जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त कोल्हापुरातल्या खासबाग मैदानात कालपासून “महातालउत्सव लोक वाद्यांचा” या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात १२५ पेक्षा जास्त दुर्मिळ वाद्यांचं प्रदर्शनही आयोजित केलं आहे.