अमळनेर नगरपालिकेत विवाह नोंदणी पुन्हा सुरू करा — माजी नगरसेवक मुन्ना शर्मा यांची मागणी
अमळनेर : विक्की जाधव.
नागरिकांच्या सोयीसाठी विवाह नोंदणीची प्रक्रिया पुन्हा नगरपालिकेतच सुरू करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मुन्ना शर्मा यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपसंचालक आरोग्य सेवा तसेच विवाह निबंधक विभागीय स्तर, महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन सादर केले आहे.

यापूर्वी विवाह नोंदणी अमळनेर नगरपालिकेत सुरळीतपणे होत होती. मात्र काही महिन्यांपासून ही प्रक्रिया ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आली असून, येथे आधार कार्डशिवाय नोंदणी न होणे, तांत्रिक अडचणी, नववधू-नवरदेवांना होणारा त्रास यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नवदांपत्यांना विवाह नोंदणीसाठी पुन्हा पुन्हा हेलपाटे घ्यावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ववत नगरपालिकेत सुरू करून ती क्यूआर कोड प्रणालीसह आधुनिक पद्धतीने राबवावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी ही पावले आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.