“माझी लाडकी बहीण” योजनेत गैरव्यवहार? – अमळनेरात ई-KYC च्या नावाखाली महिलांकडून उकळले जात आहेत रुपये!
अमळनेर : विक्की जाधव.
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली कल्याणकारी योजना असली, तरी अमळनेरात या योजनेच्या ई-KYC प्रक्रियेच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी सुरू असल्याचे बऱ्याच ठिकाणी समोर येत आहे. शासनाने ई-KYC प्रक्रिया पूर्णपणे मोफत ठेवली असतानाही काही जण प्रति KYC ₹100 ते ₹150 रुपये घेत असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांना ई-KYC करणे आवश्यक असून, शासनाने त्यासाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही. मात्र, काही केंद्रांवर OTP घेणे, मोबाईल वापर किंवा प्रक्रियेच्या कारणावरून महिलांकडून पैसे वसूल केल्याचे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गरीब आणि अशिक्षित महिलांना या प्रक्रियेत गोंधळात टाकून त्यांच्याकडून आर्थिक शोषण केल्याची खंत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत असून, “लाडकी बहीण” योजनेच्या नावावर महिलांची फसवणूक थांबविण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. शासनाने जाहीर केलेली मोफत योजना दलालांच्या जाळ्यात सापडू नये, यासाठी प्रशासनाने जनजागृती आणि नियंत्रणाची पावले उचलणे अत्यावश्यक आहे.