निष्ठावंतांना फाट्यावर मारून
गद्दारांना डोक्यावर लादू नका !
जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशी गद्दारांची पाऊलं मातोश्रीकडे वळत आहेत. या गद्दारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडायला लावणारे स्थानिक नेते स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत.”मोठा मासा” गळाला लावला ! असा आव आणला जात आहे. ज्यांनी गद्दारनाथाला सुरूवातीपासून साथ दिली असे शिवसेना द्रोही व पक्षप्रमुखांचे वैरी असलेले गद्दार वैयक्तिक स्वार्थासाठी व उमेदवारीच्या लालसेने पक्षप्रवेश करू इच्छित आहेत.
गद्दारांना क्षमा नाही, निष्ठावंत शिवसैनिक जर कवचकुंडले असतील तर या गद्दारांना डोक्यावर लादून निष्ठावंतांना फाट्यावर मारले जाणार असेल तर निष्ठावंतांची निष्ठा डळमळीत का होणार नाही ? दिपेश म्हात्रे,महेश गायकवाड हे मिंधेंचे कट्टर समर्थक व ठाकरे साहेबांचे कट्टर विरोधक म्हणून गेली अडिच वर्षे कुख्यात आहेत. “वरून” “विजय” मिळवण्यासाठी ते पक्षात घेण्यासाठी आग्रही असतील तर मग गेल्या अडिच वर्षात अशा गद्दारांच्या जाचाला, त्रासाला, गुन्ह्यांना बळी पडलेल्यांच्या थडग्यांवर यांचे विजयस्तंभ गाडायचे असतील तर गाडा. मग नंतर निष्ठावंतांनी काय करायचे? गद्दारांना गाडण्याऐवजी त्यांना आमच्या उरावर बसवत असाल तर मग तुम्ही लादलेल्या गद्दारांचा प्रचार करणे निष्ठावंतांना कसे शक्य होईल ?
याच दिपेश म्हात्रेने डोंबिवलीच्या निष्ठावंतांना किती त्रास दिला हे विचारा !मला महेश गायकवाडच्या समर्थकाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती,एका गद्दाराने खोटा गुन्हा दाखल केला. मी दोन वर्षे स्वखर्चाने कोर्ट कचेरी करीत आहे. अशा गद्दारांना एकएक करून घेण्यापेक्षा माफिनामा घेऊन शिंदेसकट सर्वांना मातोश्रीची दारं सताड उघडी ठेवा ! आमच्य बापाचे काही जाणार नाही. आम्ही निष्ठा अखेरपर्यंत जपणार ! गद्दारांचा प्रचार करण्याऐवजी घरात बाळासाहेब व दिघेसाहेबांच्या प्रतिमा लावून पुजा करू, गद्दाराव्यतिरिक्त ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचा तनमनधनाने प्रचार करू !
मी काल लेख लिहिल्यानंतर रात्री उशीरा पर्यंत मला महाराष्ट्रातून फोन येत होते.आपण निर्भीडपणे निष्ठावंतांची व्यथा मांडली म्हणून अभिनंदन करीत होते. इतकेच नव्हे शिवसेनेच्या अधिकृत ग्रुपवरही अभिनंदन व भूमिकेचे समर्थन शिवसैनिक करीत आहेत.निष्ठावंतांना महिनोन महिने भेटीसाठी तिष्ठत ठेवायचे, पदांपासून वंचित ठेवायचे व अडिच वर्षे गद्दारी केलेल्यांसाठी मातोश्रीत रेड कार्पेट अंथरून स्वागत, शिवबंधन, पद व उमदवारीची खैरात करायची हे पाहून मन विषण्ण होते, निष्ठेच्या ठिक-या ठिक-या उडतात.
उद्धव साहेबांना गद्दारांची उपयुक्तता पटवून देण्यात माहिर असलेले लोक (नेेते) असले नको ते उद्योग करतात. सत्ता तर आलीच पाहिजे परंतू गद्दारांच्या कुबडया घेऊन येत असेल तर विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल. सत्ताच महत्वाची वाटत असेल तर मग थेट भाजपशी हात मिळवणी करा व गद्दारांना गाडा ! हे पण कोणाला पटणारे नाही.
गद्दारांना सन्मान देताना ज्यांनी ५०-५० वर्षे निष्ठा जपली, शिंदेच्या खोक्यांना,
धमक्यांना,केसेसना न बधता जे उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या भावनांना पायदळी तुडवून त्यावर सततेचा मनोरा उभा करू नका ! ही आज वयाची ६८ वर्षे ओलांडलेल्या व ५१ वर्षे शिवसैनिक म्हणून जगलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकाची कळकळीची विनंती.
आगे आपकी मर्जी !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०