गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने दिले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.अनिल दादा पाटील यांना मागण्यांचे निवेदन
गटप्रवर्तकांवरील झालेला अन्याय दूर न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटना
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 3700 गटप्रवर्तक गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत.गटप्रवर्तक ह्या सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात काम करत असून कार्यक्षेत्रातील नागरिकांची माहिती संकलन करणे,लसीकरण तसेच गावोगावी कामाच्या ठिकाणी भेट देणे,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाव्यतिरिक्त महिन्यातून पंचवीस दिवस दौरे करणे, आशा स्वयंसेविकांच्या कामाचा लेखजोखा ठेवणे,दरमहा आढावा घेणे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका स्तरीय बैठीकांना उपस्थित राहणे, आशा स्वयंसेविकांनी दिलेली माहिती अद्यावत करणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिनस्त सर्व कामे ऑनलाइन व ऑफलाईन करणे,अशी अत्यंत महत्त्वाची आरोग्याशी संबंधित कामे गटप्रवर्तक करत असतात.
परंतु शासनाने जाहीर केल्याप्रमाणे गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ न देता फक्त एक हजार रुपये मानधन वाढ देण्याबाबत दि.१४ मार्च २०२४ रोजी शासन आदेश काढला आहे. सदर आदेशानुसार गटप्रवर्तकांवर घोर अन्याय झालेला असून त्यांच्यात प्रचंड असंतोष व नाराजी पसरली आहे.
राज्यातील गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या आणि मा.आरोग्य मंत्री यांनी जाहिर केल्याप्रमाणे दहा हजार रुपये मानधन वाढीचा सुधारित आदेश काढावा.अशाआशयाच्या मागण्यांचे निवेदन आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री मा.अनिल दादा पाटील यांना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रवर्तकांच्या शिष्टंडळाने देवुन झालेल्या अन्यायाबाबत मा.मुख्यमंत्री यांच्याशी भेट घडवून आणण्याची आग्रही मागणी केली.
त्यावर मंत्री महोदयांनी मा.मुख्यमंत्री यांच्याबरोबर संघटनेच्या शिष्टंडळाची मुंबई येथे मंत्रालयात भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात श्रीमती वैशाली ठाकरे,शितल सोनवणे,सविता पाटील,उषा पाटील,आशा पाटील,मनीषा पाटील,सिमा खैरनार,अर्चना हिरे, माया बोरसे, वंदना पाटील यांच्यासह आदी गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
गटप्रवर्तकांवर झालेला अन्याय विधानसभा निवडणूक आचासंहितेपूर्वी दूर न झाल्यास गतप्रवर्तक तीव्र आंदोलन करतील असा इशाराही संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.