बारामतीत मजुराच्या मुलाने मिळवले जेईई ॲडव्हान्समध्ये यश.
बारामती (प्रतिनिधी – वर्षा चव्हाण)
नुकत्याच जाहीर झालेल्या देशपातळीवरील जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये कदम अकॅडमीच्या आशिष सोनवणे विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातून 2317 रँक मिळवत यश संपादन केले. जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये कदम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यशाची परंपरा कायम राखली.
बारामतीतील धुमाळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे दैदीप्यमान यश मिळवले. वडील सुरेश सोनवणे व आई रेश्मा सोनवणे दोघेही बांधकाम व्यवसायामध्ये मजुरीचे काम करतात. या विद्यार्थ्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण भिकोबा नगरच्या विठ्ठल माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पणदरे येथे झाले. तसेच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांने शिवनगर येथील शारदाबाई पवार कनिष्ठ विद्यालयात प्रवेश मिळवला त्यानंतर मात्र त्यांनी पुढील जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षेच्या तयारीसाठी कदम अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावीपासूनच जे परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली व हे यश प्राप्त केले. स्वप्न कोणतेही असो त्याच्यामध्ये परिस्थिती कधीही आड येत नाही व प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा परिस्थितीशी झगडून आपणाला यश मिळवावेच लागते हे आशिष सोनवणे याच्या निकालावरून स्पष्ट होते.
अकॅडमीमध्ये नियमित चालू असणाऱ्या तासिका, वारंवार होणाऱ्या सराव परीक्षा, शंका निरसन तासिका , रात्रअभ्यासिका, शिक्षकांचे वैयक्तिकरित्या मिळणारे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे आशिष सोनवणे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
संपूर्ण देश पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) मध्ये सुद्धा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली. भोसले अथर्व ( 636), वाडेकर राजन(624), प्रचिती कुलकर्णी (586), सरडे विश्वेश्वर (576) , अडागळे संध्या (549), तायडे गीतांजली (534), शेख अमान (514) या क्रमाने विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत.
ज्ञान व विज्ञानाची सांगड घालत, शिस्त आणि संस्कार यांनी अवघ्या बारामती सुविख्यात असणाऱ्या या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक जयसिंग कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ.सुविराज कदम सर व इतर सर्व शिक्षकांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश प्राप्त केले.