करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – करमाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण चा डंका नेहमीच वाजवित असते. परंतु जेऊर रोडवर खेळणी असलेले एकमेव महावीर उदयान हे करमाळा नगर परिषदेतील बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे सध्या कचऱ्याचे कोठार बनलेले आहे. जे नागरिक या बागेत मुलाना खेळण्यासाठी घेऊन येत आहे ते या ठिकाणची विदारक परिस्तिथी पाहून तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी संपूर्ण बागेतील झाडे ही पाण्याअभावी जळून गेली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत त्यामुळे साप, विंचू या सारख्या विषारी प्राण्यांचे वास्तव्य या ठिकाणी सर्रास पाहायला मिळत आहे. तसेच ठिकठिकाणचे बसण्याचे बाकडे तुटलेले असून कचऱ्याचे ट्विनबिन्स तुटलेले आहेत. पाण्याचे कारंज्यामध्ये पाणी नसून झाडे उगवलेली आहेत. निवांतक्षणी बसण्यासाठी आलेल्या नागरिकाना स्मशानभूमीपेक्षाही भीतीदायक व विदारक परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. चिलटे व मच्छर या ठिकाणी नागरिकाना एक मिनिटही बसून देत नाहीत. या सगळ्या गोष्टी असताना नगर परिषदेचे बांधकाम विभाग मात्र सुस्त बसलेले पाहायला मिळत आहे. सदर बागेकरिता ठेकेदारी कर्मचारी नियुक्त केलेला असतानाही व त्याला वेतन मिळत असतानाही बागेच्या या विदारक परिस्थितीवर प्रशासन शांत बसलेले आहे तसेच लोकप्रतिनिधी सुद्धा मूग गिळून गप्प बसलेले आहेत. सदरची बाग तत्कालीन मुख्याधिकारी व आत्ताच्या सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांच्या माध्यमातून सुशोभित करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी नागरिकांचा कलही बागेकडे येण्यासाठी वाढला होता. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बागेच्या स्वछतेला व सुशोभीकरणाला गुणांकन असते. मात्र नगरपरिषदेला सदरचे गुणांकन नको असावेत हे यावरून सिद्ध होत आहे.
तसेच करमाळा नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करीत सात विहिर जवळ नाना नानी पार्क उभारली मात्र महावीर उद्याना प्रमाणेच त्याची ही दुरावस्था झालेली असल्याने करमाळा शहरात मुलाना विरंगुळ्याचे साधन राहिले नाही.
त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बागेमध्ये असलेले वारुळ
बागेतील पडलेला कचरा
बागेतील पाण्याअभावी वाळलेली झाडे
बागेतील पाण्याअभावी कोरडे कारंजे व त्यामध्ये उगवलेली झाडे
बागेतील तुटलेले बाकडे
बागेतील स्तंभासमोरील वाढलेली बाभळी व साचलेला कचरा