शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक
(पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी ग्रामस्थांची मागणी…)
प्रतिनिधी:- अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील राहुलनगर (सुलतानपूर) या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे शेतकरी दिनकर विश्वनाथ शिंदे गट नंबर ०४ व सुनील विश्वनाथ शिंदे गट नंबर ०५ या क्षेत्रातील तीन एकर ऊस पिक जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी महावितरण कंपनीने व महसूल विभाग कडून तातडीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांस नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की माढा तालुक्यातील राहुलनगर गावाकडून निमगाव मा रस्त्यावर शेतकरी दिनकर विश्वनाथ शिंदे गट नंबर ०४ व त्यांचे भाऊ सुनील विश्वनाथ शिंदे गट नंबर ०५ या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रातून महावितरण कंपनीच्या मेन लाईनीच्या विद्युत तारा गेल्या असल्याने रविवार दिनांक १७ सप्टेंबर दुपारी ०३ वाजता विद्युत तारेवर अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ऊस पिकाला आग लागून या दोन शेतकऱ्यांचे १४ ते १५ कांड्यावर असलेला ०३ एकर ऊस जळून खाक झाला आहे. एकीकडे दुतडी भरून वाहणारी सीना नदी गेले चार ते पाच महिने कोरडी आहे. कसाबसा पोटच्या पोरासारखा सांभाळलेला ऊस जळून खाक झाल्याने सरासरी पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुस्कान झालेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.