एकनाथ शिंदे,हे पाप कसे फेडणार ?
गुन्ह्याला माफि नसते !
एकनाथराव तुम्ही वैयक्तिक हितरक्षाणासाठी शिवसेनेत फुट पाडून भाजपाला फितुर झालात. मुख्यमंत्री पद मिळवलं,धाकदपटशा दाखवत अनेक निष्टावंताना फोडले शिवसेना सोडून तुमच्या गटात सामील होण्यास भाग पाडले, ज्या घरात ४० वर्षे खाऊन पिऊन गर्भश्रीमंत झालात,तरी त्याच घराचे वासे मोजू लागलात,”मी तोंड उघडले तर भूकंप हाईल!” अशी वारंवार धमकीवजा दर्पोक्ती करीत आहात.
दिल्लीला झुकविणारा व त्यापुढे कधीही मिंधेगिरी न करणा-या महाराष्ट्राचे एक मिंधे मुख्यमंत्री म्हणुन तुम्ही नित्यनेमाने मोदी शहांना कुर्निसात करीत आहात,त्यांची कृपादृष्टी कायम रहावी,यासाठी मोदी शहांवरील निष्ठेचे प्रदर्शन करून व जीहुजुरी करीत आहात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मानहानी होत नाही तर १३ कोटी महाराष्ट्रीय जनतेची मानहानी होत आहे.
एकवेळ आपण शिवेनेचे नांव गोठवाल,पक्षप्रमुख पदावरून उद्धव ठाकरे यांनाही हटवाल,पक्ष चिन्हही गोठवाल ! कारण आपण जी निष्ठेची विष्ठा केली व सत्ताधा-यांची गुलामी पत्करली त्याची बक्षिसी म्हणून मोदी शहा हे जितके देतील तितके कमीच पडेल. “बाटगा असतो तो इतर कट्टरपंथीयां पेक्षा जोरात बांग देतो” कारण आपण किती निष्ठावंत आहोत याकडे त्याला लक्ष वेधायचे असते. आपण रोज मोदी शहांचा उदउदो करून नेमके हेच करीत आहात. पण त्याच वेळी आपण फडणविस,
बावनकुळे, यांचे स्पर्धक म्हणुन त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून आपलेच पंख छाटण्याची त्यांना संधी देत आहात ! आपणांस गॅस भरलेल्या बलून प्रमाणे उंचावर गेल्यासारखे वाटत असेल पण भाजपाच्या हातातील एकच टाचणी तुम्हाला एका क्षणात जमीनीवर आदळून नामशेष करू शकते,याचे भान मुख्यमंत्री पदामुळे हरपले असावे. आत्ता आपल्याबद्धल प्रेम/आपुलकी/सहानुभूतीचा लवलेशही निष्ठावंतांत राहिलेला नाही.
तुम्ही जे महापातक केले त्याची तुम्हाला कल्पना कशी असणार ? कारण उद्धव ठाकरेंवर सूड उगवण्याच्या विखारी भावनेने आपल्याला पछाडलेले आहे. आज गेल्या ५६ वर्षापासून शिवसैनिकांत बंधु भावाचे व नोतेवाईकां इतके दृढ संबंध होते त्यांना तुम्ही तुमच्या वैयक्तिक आसूरी महत्वाकांक्षेपोटी सुरूंग लावला आहे. बंधु भावाने ५०-५० वर्षे गुण्यागोविद्याने वावरणा-या शिवसैनिकांत तुम्ही उभी- आडवी फुट पाडून त्यांना एकमेकांचे वैरी म्हणुन उभे केले,
त्यांच्या हातात ढाल तलवारी दिल्या माळक-यांना वार करी केले. तुम्ही तुमच्या पापकर्मांची फळं निश्चितपणे भोगालच पण तुम्ही फक्त ठाणे- कल्याण- मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील घराघरात जी दुही व वैरभाव निर्माण करून जे कलंकित राजकारण करीत आहात,त्याला भवानी असो की कामाख्या देवी असो कोणीच तुम्हाला क्षमा करणार नाही. कारण ती आपली चुक नसून गंभीर अपराध आहे. माझे म्हणणे तुम्हाला पटत असले तरी तुम्ही माघारीचे दोर स्वकर्तृत्वाने कापुन टाकले आहेत. आपल्या भवितव्याचे सर्व दोर दिल्लीश्वरांच्या हाती सुपुर्द करून आत्मघात केला आहे. त्यामुळे माफि- चुकीला असते गुन्ह्याला कदापि नसते,हे लक्षात आणून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
(तुमचा एकेकाळचा माजी हितचिंतक)
दिलीप मालवणकर
उल्हासनगर -जिल्हा :ठाणे
98229022470