कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव
अमळनेर – कळमसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे.यावर्षी प्रथमच दोन दिवस(10 जाने व 11 जाने.) यात्रोत्सव होणार असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे.
कळमसरे येथे गेल्या सहा ते सात वर्षापासून मरिआईचा यात्रेस प्रारंभ झाला आहे.येथील हेमंत उखा व्हलर या नवख्या भक्ताने स्वयंपूर्तीने तसेच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हि यात्रा भरावयास सुरुवात केली होती.गावात तशा ग्रामदेवता भवानी आई तसेच मरीआई अशा दोन यात्रा भरतात.मरीआई ची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मंगळवारी भरवली जाते.यादिवशी संपूर्ण गावातून बँड पथक सहवाद्य मोठी मिरवणूक निघते,या मिरवणुकीत गावातील महिला अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होतात.तसेच मरीआई चा भक्त हेमंत मिरवणूक दरम्यान घरापासून ते थेट मंदिरापर्यंत नृत्य करीत मंदिरावर ध्वज पताका लावत असतो.यामुळे हे सर्व विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.या भाविकाने यात्रेचे लावलेलं छोटेसे रोपटाचे आता भला मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.यावर्षीही भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून,गावातील व परीसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी कै. नाथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दरम्यान येत्या मंगळवारी,म्हणजेच उद्या यात्रोत्सव काळात हॉटेल्स,झुले पाळणे,खेळणी दुकाने,संसारोपयोगी साहित्यचे दुकानदार दोन दिवस आधीच दाखल झाले आहेत.यावर्षी प्रथमच दोन दिवस यात्रोत्सव होणार असल्याने दुकाने थाटावी असे आवाहन भगत हेमंत व्हलर,हेमंत न्हावी यांनी केले आहे;तसेंच यात्रे काळात भाविकांनी व जनतेने शांतता प्रस्थापित ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजक व ग्रामपंचायत कळमसरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.